ठाणे : उध्दव ठाकरे यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे संजय राऊत त्यांना काय खरे, काय खोटे सांगतात हे त्यांनाच समजत नाही, असे सांगत खऱ्या मालकाशी प्रामाणिक राहण्याऐवजी संजय राऊत दुसऱ्या मालकाशी अधिक प्रामाणिक असल्याचा टोला शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. संजय राऊत हे भंगार वृत्तीचे असून त्यामुळे पक्षाचे वाटोळे झाल्याचेही ते म्हणाले. टेंभीनाका येथील आनंद आश्रमात बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी राऊत यांच्यावर टिका केली. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत खोटी माहिती देतात. संजय राऊत यांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पुत्राने पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. संजय राऊत खऱ्या मालकाशी प्रामाणिक राहण्याऐवजी दुसऱ्या मालकाशी अधिक प्रामाणिक आहेत असे नरेश म्हस्के म्हणाले. हेही वाचा : नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून एकाला कोयता दाखवून धमकावले दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत हिंदुत्वाचे विचार व्यक्त केले जात होते. सर्वाधिक टिका काँग्रेस पक्षावर केली जात होती. परंतु आता उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार बाजूला सारले गेले असून केवळ काँग्रेसला जवळ केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली. दसरा मेळाव्यासाठी आम्ही दोन मैदानांचा पर्याय पुढे आणला आहे. यातील क्रॉस मैदानास आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.