ठाणे : काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डाॅक्टर म्हणून माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू असा टोला खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. पत्राचाळ आणि खिचडी घोटाळ्यातून मिळविलेल्या पैशातून कुणाला पाच पैशांची वैद्यकीय मदत केली आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्याला श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलेले आहे. यामुळे त्यांचा मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट

फाऊंडेशनच्या वैद्यकीय कक्षामार्फत कशाप्रकारे वैद्यकीय सेवा पुरविली जाते आणि कुणाकुणाला मदत केली जाते. त्याची संपूर्ण माहिती त्यांनी ठेवली आहे. त्यांच्या तोंडातून शिव्याशाप देण्याशिवाय दुसरे काही होत नाही. पण, आमच्या फाऊंडेशनच्या कामाबाबतच्या चांगल्या गोष्टी त्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात लिहिल्या आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.

जे लोक पत्राचाळाचे आरोपी आहेत आणि जेलमध्येही जाऊन आलेले आहेत, तेच लोक पत्र लिहीत आहेत. त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपींच्या कुटुंबियांच्या खात्यामध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले. त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, खिचडी घोटाळ्यामधून घेतलेल्या पैशातून तुम्ही एका विद्यार्थ्याला किंवा कोणत्या रुग्णाला पाच पैशांची मदत केली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता माहिती अधिकारात सर्व माहिती मिळते. यामुळे त्यांनी आधी सर्व माहिती घेतली असती आणि मग अक्कलेचे तारे तोडले असते, अशी टीकाही त्यांनी केली. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डाॅक्टर म्हणून माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

राऊत यांनी काय आरोप केलेत

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.