डोंबिवली- ठाकुर्ली मधील चोळे भागातील पाणी पुरवठ्याच्या पंपहाऊस विहिरीवर रील बनवित असताना एका १८ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन पंपहाऊसमध्ये पडून मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन दिवस अथक मेहनत घेऊन सोमवारी संध्याकाळी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
गेल्या महिन्यात ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात रुळावर रील बनवित असताना मेलने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता डोंबिवली शहराच्या बाहेर, खाडी किनारी असल्याने अनेक तरुण, तरुणी सकाळ, संध्याकाळ या भागात फिरण्यासाठी येतात. हुल्लडबाजी करताना, सेल्फी काढताना, रील बनविताना या तरुणांकडून जोखमीची कृती होऊन ते जीव गमावत आहेत, असे ठाकुर्ली भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा >>>सरस्वती हत्या प्रकरण: मनोज सानेची आज वैद्यकीय आणि मानसिक तपासणी होणार
पोलिसांनी सांगितले, बिलाल सोहिल शेख (१८, रा. मुंब्रा) असे मयत तरुणाचे नाव आहे. बिलाल शनिवारी संध्याकाळी दोन मित्रांसमवेत ठाकुर्ली येथे आला होता. ठाकुर्ली भागातील जुन्या खोल पंपहाऊस येथे गेल्यानंतर बिलालला रील बनविण्याची इच्छा झाली. पंपहाऊसची विहीर खूप खोल असेल याचा तिघांना अंदाज नव्हता. पंपहाऊस विहिरीच्या काठावर उभा राहून बिबाल रील बनवत असताना त्याचा तोल गेला. तो पंपहाऊसमध्ये पडला. बिलालने बचावासाठी धावा केला. विहिरीत उतरण्याची कोणतीही सोय नव्हती. दोन्ही मित्रांनी तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे सुरक्षा जवानांना ही माहिती दिली. तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना यासंदर्भात कळविण्यात आले.
हेही वाचा >>>जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच; नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलीमीटर नोंद
विष्णुनगर पोलिसांनी तातडीने ही माहिती पालिका अग्निशमन जवानांना दिली. अग्निशमन दल पथकाचे स्थानक अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला जवान यांनी शनिवार, रविवार दिवसभर तरुणाचा पंपहाऊस पाण्यात शोध घेतला तो आढळून आला नाही. विहिरीच्या आतील भागात कपारी आहेत. तेथे तो अडकल्याचा संशय जवानांना होता. सोमवारी पुन्हा दिवसभर शोध मोहीम राबविण्यात आली. संध्याकाळच्या वेळेत बिलालचा मृतदेह जवानांच्या हाती लागला.तरुणांनी खाडी किनारी, रेल्वे मार्गात कोणत्याही प्रकारची जोखीमयुक्त कृती करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी केले आहे.