ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील चौका-चौकांत सुशोभिकरणाच्या नावाखाली रिक्षा, बसगाड्या, हिरवळीच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. परंतु या सुशोभिकरणाचे रुपांतर आता भकास झाले आहे. रिक्षा, बसगाड्या तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी गर्दुल्ल्यांचा, मद्यपींचा हा अड्डा झाला आहे. या सर्व प्रतिकृती धुळखात पदपथावर उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना देखील अडचण ठरत आहे. त्यामुळे असे सुशोभिकरण कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ठाणे शहरात विविध भागात सुशोभिकरण करण्यासाठी शहरातील पदपथावर विविध प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. घोडबंदर भागात बसथांब्याजवळ किंवा बसथांब्याच्या जागेत रिक्षा, बसगाड्यांच्या आकाराच्या प्रतिकृती, वेलींचे छत उभारण्यात आले होते. लोकमान्य नगर, सावरकरनगर भागातही मोठ-मोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रतिकृती भकास झाल्या आहेत.
घोडबंदर येथील भागातील सेवा रस्त्यांचा मुख्य रस्त्यामध्ये समावेश करणे आणि मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील कासारवडवली ते वाघबीळ या भागात काही वर्षांपूर्वी रिक्षा, बसगाड्यांच्या प्रतिकृती आणि वेलींचे छत अशा विविध प्रतिकृती दाखवून सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु आता हे सुशोभीकरण वाईट अवस्थेत असून प्रतिकृती धुळखात पडल्या आहेत. रिक्षाच्या प्रतिकृतीतील आतील भाग पूर्णपणे खराब झाले आहे. येथील बसगाडीची देखील अशीच अवस्था आहे. तसेच एका ठिकाणावरील प्रतिकृतीच गायब झालेली आहे.
लोकमान्य नगर, यशोधननगर भागातील प्रतिकृतींची अवस्था कचरा पेटीप्रमाणे झाली आहे. यशोधननगर भागातील रिक्षाच्या आत गर्दुल्ले आणि मद्यपींनी थुंकून घाण केली असून ही रिक्षा धुळखात एका ठिकाणी कोपऱ्यात भग्न अवस्थेत पडल्याचे दिसते. लोकमान्यनगर येथील टीएमटी बसगाड्यांच्या आगाराजवळ उभारण्यात आलेली बसगाडीची प्रतिकृती देखील भंगार झाली आहे. येथे रात्रीच्या वेळेत भिक्षेकरी झोपतात. त्यांचे कपडे, चटई, साहित्य या बसगाडीत पडले आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेत येथे गर्दुल्ले झोपत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.
याबाबत ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शहरात सुशोभिकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रिक्षा प्रतिकृती उभारल्या आहेत. या प्रतिकृती अत्यंत वाईट झाल्या आहेत. अशा सुशोभिकरणाची ठाणेकरांना गरज नाही. अशा गोष्टींवर खर्च करण्याऐवजी प्रशासनाने अतिक्रमणमुक्त पदपथ आणि चांगले रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. – रणजीत पाटील, रहिवासी, घोडबंदर.