ठाणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे खोकला, घशाचा संसर्ग आणि श्वसनासंबंधीच्या आजाराच्या तक्रारी वाढत असल्याचा सूर परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे. त्यासंबंधीचा वैद्याकीय अहवाल रहिवाशांच्या समितीने एमएमआरडीएच्या बैठकीत सादर करून प्रदूषणाची चिंता व्यक्त केली.
या संकुलातील रहिवाशांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रतिनिधी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांची मुंबईत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत भुयारी मार्गाच्या खोदकामादरम्यान निघणारी माती, दगडांची वाहतूक गृहसंकुलांच्या दारातून नको आणि या मार्गाचे काम करायचे असेल तर, भुयारी मार्ग युनी अबेक्स कंपनीपर्यंत न्यावा, अशी भूमिका रहिवाशांनी मांडली. मार्गाचे एक टोक ठाण्यातील मुल्लाबाग येथे निघणार असून पुढे हा मार्ग निळकंठ वुड्स, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, कॉसमॉस लाऊंज, सत्यशंकर या गृहसंकुलांजवळून जाणार आहे.
१५ जूनपर्यंत आराखडा सादर करा
भुयारी मार्गाचा मुल्लाबाग येथून निघणाऱ्या भूमिगत मार्गाचा नवा आराखडा ३० जूनपर्यंत सादर करू, असे आश्वासन एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी समितीला दिले होते. मात्र, हा आराखडा १५ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्त मुखर्जी यांनी अभियंत्यांना दिले.
संपूर्ण मार्ग भूमिगत करण्याची मागणी
भुयारी मार्गाचे एक टोक मुल्लाबाग येथे निघणार आहे. पुढे हा मार्ग गृहसंकुलांसमोरील रस्त्याला जोडण्यात येणार असल्याचा आराखडा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सादर केला. मात्र, हा मार्ग रस्ते मार्गाला जोडू नका आणि हा मार्ग युनी अबेक्स कंपनीपर्यंत न्यावा, असा सूर रहिवाशांनी लावला.