ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत असून या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर सातत्याने टिका होता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही बांधकामे तोडण्यासाठी पालिकेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. असे असले तरी, या बांधकामांना कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतानाच, त्यावर ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या नेत्यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहे. सरकारी जमीन, खासगी जमीन, हरित क्षेत्र आणि ना विकास क्षेत्रात ही बांधकामे भुमाफियांनी केली आहेत. या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपुर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वत: मुंब्रा येथील शीळ भागात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने आणखी ११ इमारती तोडण्याचे आदेश दिल्याने पालिकेची नाचक्की झाली आहे. असे असतानाच ठाण्यातील नेत्यांनी शहरात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा दावा करत त्यावरून पालिका प्रशासनावर टिकेचा भडीमार केला.

लोकायुक्तांच्या आदेशानंतरही अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका प्रशासनावर टिका केली. यावेळी मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे आणि प्रवक्ते हिंदुराव गळवे हे उपस्थित होते. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माणाधीन आहेत. परंतु या बांधकामांवर अधिकारी मात्र थातूरमातूर कारवाई करताना दिसतात, असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला.

ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊर (yeoor) सह ३०० हून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांबाबत २०२१ मध्ये तक्रार केली होती. त्यावेळी लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणी पुरवठा देऊ नये असे आदेश दिले होते. तरीही अशा इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा देण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला होता.

बांधकामांचा आका कोण ?

अनधिकृत बांधकामप्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले. येऊर वनपरिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना बांधकाम करू देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने झाली, यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत, यांचे विकासक कोण, वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण, या बांधकामांवर वरदहस्त असलेला ठाण्यातील आका कोण, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या या नेत्याचा मात्र समावेश नाही

आपलेच राजकीय पुढारी आहेत. आपलेच मित्र आहेत. सराईत क्रिमिनल आपले ठाण्यातलेच, मोक्का आणि टाडा लागलेले हे लोक आता अनधिकृत इमारतींचे बिल्डर झाले आहेत. त्यांना पोसले जाते आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो. हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून निवडणुक लढतात. भाजपचे आमदार संजय केळकर सोडून यातूनत एकही माणूस यातून सुटला नाही, असे सांगत विक्रांत चव्हाण यांनी केळकर यांचे तोंडभरून कौतुक केले.