ठाणे : शहरातील नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी चालढकलपणा करू नका, असे स्पष्ट करत या तक्रारी १२ तासांच्या आत निकाली काढण्याचे आदेश देऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका आधिकाऱ्यांचे कान टोचले. उद्यान विभाग आणि नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम समाधानकारक नसल्याचे सांगत त्यात सुधारणा करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र दिनानिमित्ताने ठाणे महापालिकेने ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या उपक्रमाचे पालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ‌ सभागृहामध्ये सोमवारी सकाळी आयोजन केले होते. या उपक्रमाच्यामाध्यमातून आयुक्त बांगर यांनी समाजमाध्यमांद्वारे ठाणेकरांशी संवाद साधला. या दरम्यान, त्यांनी विविध विभागांच्या कामाची उदाहरणे देऊन अधिकाऱ्यांचे कान टोचले. ठाणेकर माझ्याकडे विविध तक्रारी करीत असतात आणि त्यातील एकही तक्रार खोटी निघालेली नाही. अनेकदा आपल्या विभागाची तक्रार नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु असे प्रकार होणे अपेक्षित नाही. सर्व विभागांनी एकजुटीने काम करून तक्रारींचे प्रमाण कमी करायला हवे, अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा – ठाण्यात रस्त्यावर बारीक खडीचे थर; अपघात होण्याची भिती

आपल्याला काय वाटते, यापेक्षा ठाणेकरांना काय अपेक्षित आहे, या भावनेतून विकासकामे करायला हवीत. महापालिकेकडून अशा सोयीसुविधा देणे अपेक्षित आहे की, त्या सोयीसुविधांचा ठाणेकरांनाही अभिमान वाटला पाहिजे. महापालिकेविषयी नागरिकांची मते नकारात्मक असतात. यातूनच पावसाळ्यापूर्वी रस्ते कामे होणार नाहीत, असे नागरिकांना वाटते. परंतु ३१ मे पूर्वी सर्व कामे पूर्ण करून शहर खड्डेमुक्त करून त्यांना सुखद धक्का देऊया, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. नालेसफाईच्या कामावर ९ कोटी रुपये खर्च केले जातात. पण, हा खर्च करण्याची वेळच येता कामा नये. नाल्यात कचरा साचण्यामागे दोनच कारणे असतात. एक म्हणजे घरोघरी कचरा संकलन होत नाही आणि दुसरे म्हणजे नाल्यात कचरा टाकण्याची सवय. त्यामुळे घरोघरी कचरा संकलन करण्याबरोबरच नागरिकांच्या वर्तणुकीत बदल करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

नाले सफाईची कामे योग्यप्रकारे व्हावीत म्हणूनच ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. रस्त्यांची कामे नव्या तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्वक व्हावीत यासाठी आयआयटी संस्थेच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. रंगरंगोटी म्हणजेच सुशोभिकरण नाही. शहर स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. शहरात पाणी टंचाई आणि दुषित पाण्याच्या तक्रारी आजही आहेत, त्या सोडविण्याची कामे करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची पदोन्नती, वेतनाचे लाभ हे मिळालेच पाहिजे. परंतु त्यांनीही ठाणेकरांना अपेक्षित असलेले काम करायला हवे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नागरी कामांसाठी निधी मिळेल की नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो. परंतु पालिकेवर २२०० कोटींचे दायित्व आहे. तरीही शहरात नागरी कामे सुरू आहेत. त्यामुळे निधी या विषयावर विचार करण्याऐवजी ठाणेकरांना अपेक्षित असणारी कामे करण्याबाबत विचार करायला हवा. आपण ठरविले तर शहरातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. याच मानसिकतेमधून काम केले तर शहर खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कल्याणमध्ये नालेसफाईची कामे करणाऱ्या प्रस्थापित ठेकेदारांना दणका, चार ठेकेदार वर्षभरासाठी काळ्या यादीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या नगरविकास विभागाने घेतलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत तसेच मालमत्ता कर वसुलीत चांगली कामगिरी केल्याबद्दल ठाणे महापालिकेला दुसऱ्या क्रमांकाचे दोन पुरस्कार नुकतेच प्राप्त झाले आहेत. हे पुरस्कार संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामामुळेच मिळाल्याचे सांगत आयुक्त बांगर यांनी हे पुरस्कार अधिकारी-कर्मचाऱ्यांना देऊन त्यांचे कौतुक केले.