ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, महामार्ग आणि त्यावरील उड्डाण पुलांलगत उभारण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगचा प्रकाशमान ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त असल्याचे वृत्त लोकसत्ता ठाणे या सह दैनिकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेऊन ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागाने संबंधित कंपन्यांना नोटीसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. नियमानुसार नसल्यास कारवाई करण्याचा इशाराही जाहिरात विभागाने दिला आहे.
ठाणे शहरात एकूण १३ ठिकाणी डीजीटल जाहिरात फलक उभारण्यात आलेले असून त्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, बी केबीन, हरि निवास, तलावपाळी, गणेश दर्शन, माजिवाडा, तीन हात नाका, ठाणे शहरातील उड्डाण पुलांच्या खाली, आनंदनगर, कापुरबावडी, मानपाडा, तीन पेट्रोल पंप याठिकाणी हे होर्डिंग आहेत. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक अशा सर्वच ठिकाणी डिजिटल जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. त्यावर चलचित्र स्वरुपात जाहीरात प्रसारित करण्यात येत आहेत. परंतु या जाहिरातबाजीसाठी ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे.
डिजिटल होर्डिंगवरील प्रकाशमानाची मर्यादा ही १ सीडी- सीएम (कैन्डेला स्टेराॅयडयीन पर स्क्वेअर मीटर) एवढ्या प्रभाव मर्यादेपेक्षा अधिक नसावी, असा नियम आहे. परंतु ठाण्यातील दक्ष नागरिक अजय जया यांनी डिजिटल होर्डिगचे प्रकाशमानाचे मोजमाप यंत्राद्वारे केले, त्यावेळी ते नियमापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले होते. डिजिटल होर्डींग बंद असताना त्याचे प्रकाशमान १८ लुक्स (१ सीडी- सीएम म्हजेच १ लुक्स) इतके होते तर, होर्डिंग सुरू होताच त्यावरील प्रकाशमान २०० लुक्सच्या पुढे होते. हा प्रकाशमान ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त असल्याची बाब समोर आली होती. यासंबंधीचे वृत्त लोकसत्ता ठाणे या सहदैनिकात प्रसिद्ध होताच ठाणे महापालिकेच्या जाहीरात विभागाने संबंधित कंपन्यांना नोटीसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे.
ठरवून दिलेल्या नियमापेक्षा प्रकाशमानाची मर्यादा जास्त नसावी आणि त्यासंबंधीची तपासणी करून तसे प्रमाणपत्र सादर करावे. रात्री ११ वाजेनंतर डिजिटल होर्डिंग बंद करण्यात यावेत. अपघात टाळण्यासाठी होर्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज तारांची तपासणी करावी, अशा स्वरुपाची नोटीस पालिकेकडून कंपन्यांना धाडण्यात येणार आहे. या संबंधीच्या वृत्तास ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाचे सहाय्यक आयुक्त दशरथ वाघमारे यांनी दुजोरा देत या कंपन्यांकडून नियमांचे पालन होत नसेल तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.