वाहिन्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती

ठाणे : महापालिका क्षेत्रातील वृक्ष आणि विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या इंटरनेट तसेच इतर वाहिन्या काढून टाकण्याचा ठराव दिड वर्षांपुर्वी सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. या ठरावानंतर विनापरवाना टाकण्यात आलेल्या वाहिन्या काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या विद्युत विभागाने सुरु केली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हि कारवाई थंडावली असून शहरात पुन्हा वाहिन्यांचे जाळे वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाहिन्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत असून त्याचबरोबर पालिकेचा महसुलही बुडत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात इंटरनेट तसेच इतर वाहिन्या टाकायच्या असतील तर, त्यासाठी संबंधित पुरवठादारांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा वाहिन्या भूमीगत टाकण्यासाठीच पालिका परवानगी देते आणि त्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून ठराविक शुल्क आकारते. परंतु हे शुल्क चुकविण्यासाठी अनेक पुरवठादार पालिकेच्या परवानगीविनाच अशा वाहिन्यांचे जाळे विणत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. काहीजण पालिकेचा रस्ता बेकायदा फोडून त्यात वाहिन्या टाकत आहेत. तो रस्ताही योग्य प्रकारे बुजवत नसून अनेक ठिकाणी नवीन रस्तेही खोदले जात आहेत. शिवाय, शहरातील झाडांवर आणि विद्युत खांबावर अशा वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्या तुटून काही वेळेस खाली पडतात किंवा त्या भागांत लोंबकळत असतात. यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. दिड वर्षांपुर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन सभागृह नेते अशोक वैती यांनी हा मुद्दा उपस्थित करत बेकायदा वाहीन्या काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देऊन तसा ठराव केला होता. या ठरावानंतर झाडांवर तसेच विद्युत खांबावर बेकायदा टाकण्यात आलेल्या वाहीन्या काढून घेण्याबाबत वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली होती. या नोटीसची मुदत संपुष्टात येताच विद्युत विभागाचे तत्कालीन उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी अशा वाहिन्या काढून टाकण्याची कारवाई सुरु केली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावल्याचे चित्र असून यामुळे संबंधित पुरवठादारांचे फावले जात आहे. ठाणे शहरातील सेवा रस्ते, अंतर्गत रस्ते अशा सर्वच भागात पुन्हा वाहिन्यांचे जाळे वाढू लागले असून काही ठिकाणी वाहीन्या तुटून लोंबकळत आहेत. या वाहिन्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत असून त्याचबरोबर विनापरवाना वाहिन्या टाकल्या जात असल्याने पालिकेचा महसुलही बुडत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृक्ष आणि विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या इंटरनेट तसेच इतर वाहिन्यांवर आमच्या विभागाकडून कारवाई सातत्याने केली जात आहे. जसे आमच्या निदर्शनास येते, तसे आमचे पथक कारवाई करते. परंतु कारवाईनंतर पुन्हा वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत. शुभांगी केसवानी- उपनगर अभियंता (विद्युत), ठाणे महापालिका