बदलापूर : वेळेपूर्वीच आलेल्या पूर्व मोसमी आणि मोसमी पावसामुळे निसर्गचक्र बदलल्याची चर्चा असतानाच याचे काही सकारात्मक पडसादही दिसू लागले आहेत. यंदा कधी नव्हे ते मे महिन्यातच रानभाज्यांनी भाजी मंडई व्यापली आहे. अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील आदिवासी बांधव आणि भगिनींना या रानभाज्यांमुळे दरवर्षी हक्काचा रोजगार मिळत असतो. मात्र यंदा मे महिन्यातच रान भाज्या उगवल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मोसमी पाऊस सुरू होताच डोंगर दऱ्यांमध्ये कोणत्याही लागवडीशिवाय रानभाज्या उगवतात. पूर्वापार चालत आलेल्या अभ्यासातून या रानभाज्या ओळखून त्या बाजारात आणण्याचे महत्वाचे काम आदिवासी बांधव करत असतात. अनेक पिढ्यांनी या रानभाज्या शिजवण्याचे कौशल्यही आत्मसात केले आहे. जुन्या जाणत्या महिला आजही रानभाज्या आवर्जून बनवतात. या रान भाज्या पौषक घटक असलेल्या असतात. त्यामुळे त्याकडे अनेकांचा ओढा असतो.
जून महिन्यात मोसमी पाऊस पडल्यानंतर या रान भाज्या उगवू लागतात. मात्र यंदा पश्चिम विक्षोभामुळे मे महिन्यातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. एखाद दोन दिवसाच्या अंतराने सातत्याने पाऊस झाला. त्यामुळे रानभाज्या उगण्यास पोषक वातारण झाले. परिणामी मे महिन्याच्या दुसऱ्या आठव़ड्यातच आदिवासी बांधवांना रानभाज्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि कल्याणच्या ग्रामीण भागात तसेच शहरातही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच रानभाज्या मिळू लागल्या. या रानभाज्या आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार देतात. ऐरवी जांभूळ, करवंदे आणि अखरेच्या टप्प्यातील आंबे मे महिन्यात आदिवासी बांधव विक्रीसाठी आणत असतात. आता मात्र त्या सर्वांच्या जोडीला रान भाज्याही बाजारात आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव आणि विशेषतः महिलांना रोजगार मिळतो आहे. बदलापूर, अंबरनाथ शहराच्या बाजारात, शहरांच्या वेशीवर मुख्य रस्त्यांवर महिला रानभाज्या विक्री करताना दिसत आहेत.
या रानभाज्या बाजारात
रानभाज्यामध्ये चायवळ, शेवळीचे प्रमाण यंदा अधिक असल्याची माहिती रानभाज्यांचे अभ्यासक अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी दिली आहे. सोबतच तेरं,कंटोळी,भोपळ्याची फुले,लाल माठाचे देठ, शेवगा, कुरडू, गाभुळीची भाजी, मोठ्या गावठी काकड्या अशी बऱ्याच रानभाज्या बाजारात आल्या आहेत.
प्रतिक्रियाः यंदा पूर्व मोसमी पाऊस लवकर आणि विक्रमी क्षमतेने कोसळल्याने रानभाज्या लवकर आल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. – राजेंद्र भट, कृषीतज्ज्ञ, बदलापूर.
गेल्या काही वर्षात आदिवासी बांधवांसोबतच बिगर आदिवासी व्यक्तीही रानात रानभाज्या शोधत संकलीत करत असल्याचे दिसून आले आहे. अहिल्यानगर, घाटमाथ्यावरील विक्रेतेही समुहाने या भाजा गोळा करण्यासाठी नाणेघाट आणि आदिवासींच्या वनपट्ट्यात येत असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात यामुळे संघर्षाची चिन्हे दिसत असल्याचे मत अनेक जण व्यक्त करतात.