कल्याण - मुरबाड तालुक्यातील देवपे गावातील तरूणाला दोन दिवसापूर्वी बारवी धरण परिसरात अडवून त्याचे दोन्ही हात सहा हल्लेखोरांनी कापून टाकले आहेत. त्याच्या सर्वांगावर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले आहेत. या सर्व हल्लेखोरांचा मुरबाड पोलिसांची विशेष तपास पथके शोध घेत आहेत. या प्रकरणात मुरबाड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि त्यांच्या सहा साथीदारांचा सहभाग असल्याचा जबाब गंभीर जखमी झालेल्या सुशील भोईर याने पोलिसांना दिला आहे. पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात तशी नोंद केली आहे. हल्ल्यानंतर सुशील काही वेळ रस्त्यावर पडून होता. त्यामुळे सुरूवातीला त्याची हत्या झाल्याची माहिती सर्वदूर पसरली होती. हल्लेखोरांनी सुशीलचे दोन्ही हात धारदार तलवारीने कापून टाकले आहेत. सुशीलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डाॅक्टरांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले आहे.हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती पुढे येत असली तरी या हल्ल्याच्या मुळाशी राजकीय कारणे असल्याची चर्चा मुरबाड तालुक्यात आहे. पोलीस या सर्व प्रकरणांचा विविध अंगांनी तपास करत आहेत. हेही वाचा >>>“मनोज जरांगे यांच्यापुढे आपण किती झुकणार”, मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर बारवी धरण परिसरातील देवपे गावात राहणारे सुशील भोईर शुक्रवारी रिक्षेतून बारवी धरण परिसरातील रस्त्यावरून चालले होते. यावेळी समोरून माजी सभापती श्रीकांंत धुमाळ आणि त्याचे पाच साथीदार आले. त्यांनी सुशीलची रिक्षा अडवून त्याला रिक्षेतून खाली खेचले. त्याच्यावर धारदार तलवारीने वार करून त्याचे दोन्ही हात कापून काढले. त्याच्या सर्वांगावर वार केले. घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे. बराच वेळ सुशील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बेशुध्दावस्थेत असलेला सुशील सुरुवातीला निपचित असल्याने त्याची हत्या झाल्याची चर्चा होती. रात्री उशिरापासून तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहार नंतर महाराष्ट्रात असे प्रकार सुरू झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर संताप व्यक्त केला जात आहे.