ठाणे : बेसुमार पाणी वापराला लगाम बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जलमापके बसविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणेच देयक आकारले जाणार आहे. उर्वरित २० टक्के जलमापके बसविण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील चाळी आणि झोपडपट्टी भागात ठोक पद्धतीने पाणी देयके आकारली जात आहेत. यामुळे चाळी आणि झोपडपट्टी भागात पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. घरासमोरील रस्ते आणि वाहने पाण्याने धुणे असे प्रकार सुरू असतात. तर, शहरातील इमारतींमध्ये घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी देयकांची आकारणी केली जाते. जलमापके बसविण्यात आलेली नसल्यामुळे पाणी वापर नेमका किती होतो, याचा अंदाज पालिका प्रशासनाला येत नव्हता. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर जलमापके बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. करोना टाळेबंदीच्या काळात हे काम काहीसे थंडावल्याचे चित्र होते. परंतु करोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. हेही वाचा - डोंबिवलीतील गायक अविनाश देवधर यांचे निधन ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १ लाख १३ हजार ३२८ जलमापके बसविण्यात येणार आहेत. पैकी आतापर्यंत ९५ हजार ५०० जलमापके बसविण्यात आलेले आहेत. शहरातील गृहसंकुलांच्या ठिकाणी हे जलमापके बसविण्यात आली आहेत. यापैकी काही रहिवाशांना जलमापकाप्रमाणे देयके पाठविण्यात येत असून त्यामध्ये सुरुवातीला त्रुटी आढळून आल्या होत्या. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यात दुरुस्ती केली होती. जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक राहिले आहे. लोकमान्य नगर, कोपरी, आनंद नगर, बाळकुम, वाघबीळ, ओवळा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये काही ठिकाणी जलमापके बसविण्याची कामे शिल्लक आहेत. उर्वरीत १७ हजार ८२८ जलमापके बसविण्याचे काम शिल्लक असून ही कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेने ठेवले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. हेही वाचा - डोंबिवलीत आयरे गावात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरा प्रभाग समितीनिहाय बसविण्यात आलेल्या जलमापकांची आकडेवारी प्रभाग समिती आणि जलमापकांची संख्या लोकमान्य सावरकर - ८६९१माजीवडा मानपाडा - १८३६१नोपाडा कोपरी - १००७६उथळसर - ६९३२वर्तकनगर - ७११४कळवा - २५३०१वागळे इस्टेट - ११३३८दिवा - ४४८५मुंब्रा - ३२५३एकूण - ९५५५१