कल्याण – आपल्या शाळेच्या पाठीमागील संंरक्षण भिंत धोकादायक झाली आहे. यासंदर्भात परिसरातील रहिवाशांनी शाळेकडे तक्रारी केल्या. तरीही त्या तक्रारींची दखल न घेता आणि संरक्षण भिंत धोकादायक झाली आहे हे माहिती असुनही त्या भिंतीची डागडुजी टिटवाळा बनेली येथील केबीके इंटरनॅशनल शाळेचे संचालक सुबराव खराडे यांनी केली नाही. ही धोकादायक भिंत कोसळून शुक्रवारी एक मुलाचा मृत्यू आणि दोन मुले जखमी झाल्याच्या घटनेला शाळा संचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा ठपका ठेवत टिटवाळा पोलिसांनी शाळा संचालकावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी तत्पर हालचाली करून शाळा संचालक सुबराव बाबासाहेब खराडे यांना शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता अटक केली. मृत मुलाची आई अन्नपुर्णा राजकुमार सिंग यांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी केबीके इंटरनॅशनल शाळेचे संचालक सुबराव खराडे (रा. आदिवासीवाडी, उंबर्णी रस्ता, टिटवाळा पूर्व) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. केबीके शाळेच्या पाठीमागील संरक्षण भिंत कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली दबून शुक्रवारी संध्याकाळी अंश राजकुमार सिंंग (११) या मुलाचा मृत्यू झाला. तर अभिषेक सहानी (१०), शोएब शेख (१०) हे गंभीर जखमी झाले. शोएबच्या पायाला गंभीर दुखापत, अभिषेकच्या हात, पायाला दुखापत झाली आहे.

अन्नपुर्णा सिंग यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मागील अकरा वर्षापासून आपण केबीके शाळेच्या पाठीमागील बाजुतील चाळीत राहतो. केबीके शाळा आठ वर्षापूर्वी बांधली आहे. आपला मयत मुलगा अंश हा केबीके शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. शाळेला सुट्टी असल्याने अंश, अभिषेक आणि शोएल शुक्रवारी संध्याकाळी केबीके शाळा आणि राहत्या चाळीच्या मधल्या भागात खेळत होते. यावेळी अचानक शाळेची धोकादायक अनधिकृत संंरक्षक भिंत तिन्ही खेळकरी मुलांच्या अंगावर कोसळली. तिन्ही मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. यात अंशचा जागीच मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले.

शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम केल्यानंतर त्याला सीमेंटचे प्लास्टर करण्यात आले नव्हते. त्यामुळे भिंतीच्या विटा उघड्या पडल्या होत्या. प्लास्टर नसल्याने या संरक्षण भिंतीला भेगा पडल्या होत्या. परिसरातील चाळीतील रहिवाशांनी शाळेचे संचालक सुबराव खराडे यांच्याकडे संरक्षण भिंत दुरुस्तीची मागणी केली होती. अनेक वेळा मागणी करुनही सुबराव खराडे आणि शाळा व्यवस्थापनाने रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

शुक्रवारी ही धोकादायक संरक्षण भिंती इमारत आमच्या मुलांच्या अंगावर कोसळली. या सर्व घटनेला शाळा संचालक सुबराव खराडे यांचा निष्काळजीपणा, दुर्लक्षितपणा जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी मृत मुलाच्या आईच्या तक्रारीवरून शाळा संचालक खराडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या शाळेची धोकादायक संरक्षण भिंत पालिकेच्या अ प्रभागाचे तोडकाम पथक, अग्निशमन जवानांनी शुक्रवारी जमीनदोस्त करून टाकली आहे. ही भिंत बांधण्यासाठी पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी शाळेने घेतली नव्हती, अशी माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पोलिसांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.