सूर्या योजनेच्या जलवाहिनीची गळती झाल्याने वसई-विरारच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या हालअपेष्टांत भर पडण्याची चिन्हे आहेत.
वसई-विरार शहराला सूर्या धरणातून पाणीपुरवठा होतो. काशिद कोपर येथे या योजनेच्या जलवाहिनीची गळती सुरू आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवार, १६ फेब्रुवारी आणि बुधवार, १७ फेब्रुवारी या दोन दिवशी शहरातला पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित केला जाणार आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.