उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एकीकडे पाणी टंचाईवरून ओरड होत असताना पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध पाऊले उचलली आहेत. आठवडाभरापूर्वी शहरातील पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता पालिका प्रशासानाने शहरातील बंद असलेल्या कुपनलिका दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी ४६ लाखांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. शहरात सध्या २४४ कुपनलिका असून त्यातील निम्म्याहून अधिक नादुरूस्त स्थितीत आहेत.

उल्हासनगर शहरातील पाणी पुरवठ्यावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा गरदारोळ सुरू आहे. पाणी योजना राबवूनही शहरातील बहुतांश भाग गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करतो आहे. त्यावरून नागरिकांनी गेल्या काही दिवसात आंदोलनाचे हत्यार उपसले. तर राजकीय पक्षांनीही पालिकेवर धडक मोर्चा आणत पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरात समन्यायी पाण्याचे वाटप करण्यासाठी पाऊले उचलली.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने शहरातील पाणी वितरण वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार कोणत्या भागात कोणत्या वेळी पाणी पुरवठा होईल याची माहिती देण्यात आली. काही भागात एक दिवसाआड, काही भागात उपलब्धतेनुसार पाणी येईल हेही पालिका प्रशासनाने जाहीर केले. कोणत्या भागात कोणत्या वेळी पाणी उचल केली जाते याचीही माहिती पालिकेने दिली होती. त्यानंतर शहरातील पाणी वितरणातील तक्रारी आणि समस्या काही अंश कमी झाल्याचे दिसून आले.

उल्हासनगर शहरातील पाणी साठ्यावर ताण येत असताना सार्वजनिक वापरासाठी कुपनलिकांचा वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने आता घेतला आहे. सार्वजनिक उद्याने, नागरी वापरासाठी आवश्यक पाणी या कुपनलिकांच्या माध्यमातून पुरवण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने आता शहरातील २४४ कुपनलिकांच्या दुरूस्तीसाठी निविदा जाहीर केली आहे. यात ४६ लाखांची निविदा मागवण्यात आली असून कुपनलिकांची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. या पाण्याचा वापर उद्याने, सार्वजनिक शौचालये, बैठा चाळींमध्ये वापरण्यासाठीचे पाणी म्हणून केला जाऊ शकतो, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

… तरीही १२४ कुपनलिका नादुरूस्त कशा

उल्हासनगर शहरातील २४४ कुपनलिकांची देखभाल दुरूस्ती जवळपास दरवर्षी केली जाते. मात्र तरीही तब्बल १२४ कुपनलिका सध्या नादुरूस्त असल्याची माहिती समोर आली आहे. वार्षिक देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली ४६ लाखांचा खर्च होत असताना आणि दरवर्षी या कुपनलिकांची दुरूस्ती केली जात असताना इतक्या कुपनलिका बंद कशा अशा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.