भातसा धरण क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडून सुमारे ६ हजार २१५.४४ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील प्रामुख्याने शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव आणि नदीकाठावरील इतर गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यात येणारी भातसा, मोडक सागर, तानसा या धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. भातसा धरणाची एकूण पातळी ही १४२.०७ मीटर इतकी आहे. धरण क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी आज (मंगळवार) दुपारी १२.३० वाजेपर्यंत १३८.१० मीटर पर्यंत आली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता धरणाचे १ ते ५ क्रमांकाचे दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातून धरणातील ६२१५.४४ क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे. त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव आणि इतर गावांमध्ये स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.