कल्याण- रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या सखल भागात पाणी साचले आहे. पहाटेपासून शहरातील बाजार गजबजून जातात. परंतु, झोड पावसामुळे बाजारांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. फेरीवाले रस्त्यांवरुन गायब आहेत.उल्हास खाडी किनारी भराव टाकून बुजवलेल्या बेकायदा चाळींमध्ये पाणी घुसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशा भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उल्हास, काळू नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू झाला की ज्या खाडी किनारच्या भागात महापुराचे पाणी घुसते. या भागातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक संथगतीने होत आहे. या संथगतीचा वाहतुकीचा विदयार्थी वाहतूक करणाऱ्या बसना मोठा फटका बसला आहे. वर्तमानपत्रात खड्डयांविषयीच्या बातम्या आल्याशिवाय अधिकारी, ठेकेदार कामच करत नसल्याचे चित्र आहे. पालिका मुख्यालयातील किरकोळ बैठका, दूरदृश्य प्रणालीतून होणाऱ्या बैठका, न्यायालयातील कामे यामध्ये बहुतांशी अधिकारी व्यस्त राहत असल्याने क्षेत्रिय स्तरावरील काम करण्यास अनेक अधिकाऱ्यांना वेळ नाही. हेही वाचा >>>पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीहेही वाचा >>>उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, काळू नदी इशारा पातळीवर, ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस निष्क्रिय पध्दतीने काम केले की अधिकारी असो की ठेकेदार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची जी पध्दत इतर पालिकांमध्ये अवलंबली जाते तसा प्रकार कल्याण डोंबिवली पालिकेत होत नाही. त्याचा गैरफायदा यंत्रणा घेत आहेत. वर्षानुवर्षाचे नगरसेवकांच्या दावणीचे ठराविक डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर मधील मोजके रस्ते, खड्डे भरणी ठेकेदारच पालिकेत काम करत आहेत. त्यांना निर्ढावलेपण आले असल्याने या ठेकेदारांना कोणीही अधिकारी काहीही बोलत नाही. ठेकेदारही आपल्याला काही होणार नाही आणि आपली देयके राजकीय दबावातून वेळेत निघतील या फुशारकीत राहतो. या सुस्त पध्दतीचा सर्वाधिक फटका कल्याण, डोंबिवली शहरांना बसत आहे.खड्डे भरणीची बहुतांशी कामे लोकप्रतिनिधींच्या विश्वासातील ठेकेदार वर्षानुवर्ष घेत आहेत. एकही गुणवत्तेने काम करणारा ठेकेदार यामुळे पालिकेत येत नाही.