ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाण्याची वाहिनी तुटल्यामुळे कळवा, दिवा, मुंब्रा भागाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती कामासाठी १२ ते १५ तास लागणार असून तोपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कळवा, दिवा आणि मुंब्रा भागात करण्यात येतो.
सोमवारी सकाळी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील १८०० मी. मी व्यासाची अशुद्ध पाण्याची वाहिनी तुटली. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून काम पूर्ण होण्यास १२ ते १५ तास लागणार असल्याचे एमआयडीसीने कळवले आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती येथील पाणीपुरवठा १२ ते १५ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल. तरी कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.