ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी शाळा सुरू करण्याबरोबरच मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांचा गणवेश करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी गणवेशाच्या रंगाबाबत पालिकेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश ठेवण्याबाबत पालिकास्तरावर विचार सुरू आहे. यामुळे पालिका शाळांचा गणवेश बदलण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ६७ बालवाडी, ११७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये एकूण ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिका शाळेच्या पटसंख्येत घट होऊ लागली आहे. पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढला आहे. यामुळे पालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. तसेच पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित केले असून त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचेही प्रस्तावित केले आहे.

हेही वाचा – ठाणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

इंग्रजी शाळा सुरू करण्याबरोबरच मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. शाळा इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, बालस्नेही वर्ग तयार करणे, स्मार्ट वर्ग खोली तयार करणे, वर्गखोली डिजीटल करणे अशी कामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांचा गणवेश करण्याचा विचार सुरू केला आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश ठेवण्याबाबत पालिकास्तरावर विचार सुरू आहे. तसेच गणवेश कोणत्या रंगाचा असावा आणि चांगल्या दर्जाचे कापड आहे का या सर्वांची पालिका चाचपणी करत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा – ठाण्यातील धुळ नियंत्रण यंत्रणा अखेर कार्यान्वित

गणवेश यंदा की पुढच्या वर्षी?

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. या गणवेशाचा रंग कोणता असावा यासाठी पालिकेकडून चाचपणी करण्यात येत आहे. असे असले तरी पालिका शाळा सुरू होण्यासाठी दिड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वेळेवर देण्याचे आदेश शिक्षण विभागाला यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे ३५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश दिड महिन्याच्या कालावधीत तयार होऊ शकतील का याचाही पालिका आढावा घेत आहे. त्यामुळे दिड महिन्यांत शक्य झाले तर यंदा गणवेशाचा रंग बदलेल आणि पुढच्यावर्षी गणवेशाचा रंग बदलेल, अशी माहिती सुत्रांनी दिली.