झुंजारराव वाडा , नेवाळपाडा, तालुका- मुरबाड, जिल्हा- ठाणे.

गेल्या शतकात कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठळक व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शंकरराव झुंजारराव. या ऐतिहासिक शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. आता महापालिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे, तो शंकरराव चौक त्यांच्याच नावाने ओळखला जातो. शिवाजी चौक परिसरातील भाजी मंडईसुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून ओळखली जाते. झुंजारराव कुटुंबीयांचे मूळ गाव मुरबाडमध्ये आहे. तेथील नेवाळपाडा येथील १८ व्या शतकातील भव्य वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही उभा आहे.

कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मुरबाड, सरळगाव अशी अनुक्रमे गावे पार करीत तब्बल ४५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपण ‘नेवाळपाडा’ परिसरात येऊन पोहोचतो. कल्याण ते नेवाळपाडा अंतर कापण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ चा वापर करावा लागतो. इतर रस्त्यांच्या तुलनेत हा उत्तम दर्जाचा रस्ता चटकन नजरेत भरतो. त्यावरून प्रवास करताना अजिबात थकवा जाणवत नाही. नेवाळपाडा परिसरात पोहोचल्यानंतर एक भव्य वाडा आपल्या नजरेस पडतो. आजुबाजूला असलेल्या आधुनिक बंगल्यांच्या गर्तेत सापडलेला हा १८ व्या शतकातील भव्य वाडा आपल्याला मोहून टाकल्याखेरीज राहात नाही. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या झुंजारराव कुटुंबाचा हा वाडा आहे. कल्याणचे पहिलेवहिले नगराध्यक्ष दिवंगत शंकरराव झुंजारराव यांचा हा वाडा आहे.

नेवाळपाडा परिसरातील झुंजारराव वाडय़ासमोर उभे राहिल्यानंतर वाडय़ाची भव्यता पाहूनच आपण भारावून जातो. भारावलेल्या अवस्थेतच आपण दिंडी दरवाजाद्वारे वाडय़ात प्रवेश करतो. वाडय़ात प्रवेश केल्यानंतर लगेचच आपल्याला वाडय़ातील ‘चौका’चा भाग लागतो. पूर्वीच्या काळी हिंस्र जनावरांचा या परिसरामध्ये वावर असे. त्यामुळेच घरातील लहान मुला-मुलींना वाडय़ाच्या बाहेर खेळायला पाठविणे थोडे जिकिरीचेच ठरत असे. अशा वेळी लहान मुलांना खेळण्याचा तितकाच आनंद घेता येवा आणि सुरक्षितताही बाळगली जावी, या दृष्टिकोनातून वाडय़ाचा दिंडी दरवाजा बंद करून चौकाच्या या भागात घरातील लहान मुला-मुलींना दंगा करण्याचे जणू काही प्रमाणपत्र घरातील थोरल्या मंडळींकडून दिले जात असे. मुख्यत्त्वेकरून वाडय़ाच्या या भागात घरातील मंडळींना एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरीत्या कामे करता यावीत, यासाठी चौक या भागाची रचना वाडय़ात असे. परंतु निवडक वाडय़ांमध्येच चौकाची रचना पाहायला मिळते. त्यात झुंजारराव वाडय़ाचे नाव आवर्जून घ्यावे लागते. वाडय़ातील चौकाच्या या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असे. त्यामुळेच सकाळच्या वेळी आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा चौकाच्या या भागाला महत्त्व होते. चौकाच्या या भागात थेट सूर्यप्रकाश पडत असल्याने घरातील वाळवणेही याच भागात घातली जात असत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू आवर्जून चौकाच्या या भागात साजरे केले जात असत. त्याचप्रमाणे वामकुक्षी अथवा विश्रांतीसाठीही चौकाचा वापर केला जात असे. विशेष म्हणजे वाडय़ातील अन्य भागातून चौकाचा भाग दिसावा, अशी वाडय़ाची रचना आहे.

वाडय़ातील चौकातून पुढे आल्यानंतर ओटीचा भाग आपल्या निदर्शनास पडतो. ओटीच्या या परिसरात दोन कोनाडेही पाहायला मिळतात. या कोनाडय़ांच्या अगदी वर निराळ्याच प्रकारचे चित्र दिसते. एका कोनाडय़ाच्यावर चंद्र तर दुसऱ्या कोनाडय़ावर सूर्यासारखे चित्र पाहायला मिळते. संपूर्ण वाडय़ाचे बांधकाम लाकडी असून आज वाडय़ात शिसवी टेबल, कुंकवाची लाकडी पेटी, पानाचा पितळी डबा, गंध उगळायची लाकडी सहाण, लाकडी डेस्क, अंघोळीसाठी वापरात येणारे घंगाळे, सामान ठेवण्यासाठी असणारा पेटारा आदी जुन्या गोष्टी पाहायला मिळतात. आजच्या आधुनिक घरांमध्ये ‘वुडन फ्लोअरिंग’ करण्याची पद्धत आहे. परंतु १८ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या झुंजारराव वाडय़ामध्येही ते पाहायला मिळते. यावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकते की, जुन्या वास्तूंमध्ये असणाऱ्या या गोष्टी आपण कशा फॅशनच्या नावाखाली आता पुन्हा वापरत आहोत. वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या भागातील लाकडी बांधकाम आणि त्यावरील महिरप आपले लक्ष आवर्जून वेधून घेते.

१८ व्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधला. जयराम झुंजारराव हे स्वत: जमीनदार होते. याशिवाय त्यांचा भात खरेदी-विक्रीचा व्यवसायही होता. कै. जयराम झुंजारराव यांचे सुपुत्र अर्थात कल्याणचे पहिलेवहिले नगराध्यक्ष कै. शंकरराव झुंजारराव होय. शंकरराव झुंजारराव ठाणे लोकल बोर्डाचे सभासदही होते. मुरबाड तालुक्यातील सर्वात जुने वाचनालय म्हणून प्रचीती असणाऱ्या ‘भाऊ गणपत’ वाचनालयाची स्थापना १८९२ मध्ये झुंजारराव कुटुंबीयांनी केली. काही वर्षांपूर्वी पडझडीमध्ये वाचनालयाची इमारत जमीनदोस्त झाली. त्याचप्रमाणे कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील विविध शाळा, वसतीगृह सुरू करण्यामध्ये झुंजारराव कुटुंबाचे मोठे योगदान आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ज्या ठिकाणी आहे, तो परिसर ‘शंकरराव चौक’ यानावानेच आजही परिचित आहे. कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात असणारी भाजी मंडई ‘झुंजारराव मार्केट’ म्हणून ओळखली जाते. उ

झुंजाररावांचा महसूल अधिकार

मुरबाड तालुक्यातील काजगाव, संगमेश्वर, मौजे-नागाव, मौजे-खुटल, सरळगाव आदी गावांतील महसूल गोळा करण्याचा अधिकार झुंजारराव कुटुंबीयांकडे होता. महसूल व्यवहाराचा सर्व कारभार या वाडय़ातून चालत असे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाड तालुक्यात महसूल गोळा करण्यासाठी येत असत. या काळात नेवाळपाडय़ातील या झुंजारराव वाडय़ात त्यांचा मुक्काम असे.

शंकररावांचे वाडय़ातील वास्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कै. शंकरराव झुंजारराव यांचे सुरुवातीला वास्तव्य नेवाळपाडय़ातील याच वाडय़ात होते. नंतरच्या काळात ते नेवाळपाडय़ाहून कल्याणला स्थायिक झाले. पूर्वीच्या काळी साधारण ४० सदस्यांचा या वाडय़ात राबता होता. सध्या या वाडय़ात मात्र जयवंत झुंजारराव आणि त्यांची पत्नी दमयंती झुंजारराव वास्तव्यास आहेत. त्यांना तीन मुले असून नवीन झुंजारराव आणि शेखर झुंजारराव यांचे वास्तव्य कल्याणात तर उज्ज्वल झुंजारराव यांचे वास्तव्य नाशिकमध्ये असते.