लग्नात पैसे देऊन वऱ्हाडी मंडळी बोलवावी लागल्याचा प्रकार तुम्ही ऐकलात का? तसं आपल्या भारतीयांवर अशी वेळ कधी येतच नाही म्हणा. कारण लग्न म्हटलं की शेजारीपाजारी सहकुटुंब, सहपरिवार- मित्रपरिवार लग्नात 'सहभोजना'साठी हजर असतातच. तेव्हा पैसे देऊन वऱ्हाडी मंडळी बोलावण्याची गरजच भासत नाही. एकेकदा तर एवढे लोक लग्नाला येतात की 'बाबा रे मीच तुला पैसे देतो पण माझ्या लग्नात आणखी गर्दी करायला येऊ नको' असं वगैरे सांगण्याची पण वेळ आली तर नवल वाटायला नको. तेव्हा पैसे देऊन वऱ्हाडी आणण्याचे प्रकार आपल्या इथे घडत असल्याचे तरी ऐकिवात नसली. पण चीनमध्ये मात्र असा प्रकार घडलाय. या नवरदेवाने लग्नात चक्क पैसे देऊन अभिनेते बोलावले होते. या अभिनेत्यांना आपण फक्त नवऱ्याचे खूप चांगले मित्र मैत्रिणी आहोत, असा अभिनय करायचा होता. तर काहींना नवरदेवांच्या कुटुंबियांची भूमिका वठवायची होती. आपल्या लग्नात पैसे देऊन अशी पाच पन्नास नाही तर तब्बल २०० माणसं त्याने बोलावली होती. या प्रत्येकाला त्याने सातशे ते साडेसातशे रूपये दिले होते. काहींबरोबर तर त्यांने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही सौदा केला. या हुशार नवरदेवाने पैसे देऊन लग्नात वऱ्हाडी मंडळींची गर्दी जमवली खरी पण त्यांना आपल्याबद्दल माहिती द्यायला मात्र तो विसरला. जेव्हा वधूच्या कुटुंबियांनी आपुलकी म्हणून नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडी मंडळींकडे चौकशी केली तेव्हा मात्र काहीतरी काळंबेरं असल्याचा त्यांना संशय आला. आता नवरदेवाचे आपण जवळचे मित्र आहोत असे सांगणाऱ्यांनां या नवरदेवाबद्दल काहीच सांगता येईना. शेवटी या नवरदेवाचे बिंग फुटले, मग काय नवरदेवापासून ते नकली वऱ्हाडी मंडळींपर्यंत सगळ्यांनाचा तुरूंगाची हवा खावी लागली.