राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अडीच महिन्यांहून अधिक काळापासून राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. देशामध्ये २५ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्याही आधीपासून उद्धव ठाकरे हे फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब लाइव्हच्या माध्यमातून करोनासंदर्भातील परिस्थितीपासून ते अगदी निसर्ग वादळासंदर्भातील माहिती देताना दिसत आहेत. मात्र उद्धव ठाकरे आपल्या या लाइव्हमध्ये बोलताना ठराविक पद्धतीनं बोलतात, त्याच आशयाची वाक्य फिरवून परत परत सांगतात अशी खिल्ली मीम्सच्या माध्यमातून विरोधकांकडून उडवली जात आहे. एकाच अर्थाची वेगवेगळी वाक्यं उद्धव ठाकरे गोल गोल फिरवून सांगतात अशी उपहासात्मक टिका त्यांच्यावर करण्यात येत आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर मुख्यमंत्री ठाकरे चांगलेत ट्रोल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरेंच्या शैलीवर टोला लगावला आहे.
संदीप देशपांडे हे ट्विटरवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. राजकीय शेरेबाजीपासून ते मराठी मुलांनी सुरु केलेल्या उद्योग व्यवसायासंदर्भात देशपांडे ट्विटवरुन भाष्य करत असतात. नुकतीच त्यांच्या राजकीय टोलेबाजीची झलक ट्विटरवर पहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी  ३१ मे रोजी मिशन बिगिन अगेन… अर्थात पुनःश्च हरिओम हा नारा देताना, “लॉकडाउन करणं हे सायन्स असेल तर लॉकडाउन उघडणं हे एक आर्ट आहे,” असं म्हटलं होतं. हाच मुद्दा पकडून देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या त्याच त्याच बोलण्यावर उपहासात्मक टोला लगावला आहे.

“नळातून पाणी येत, पाणी येत नळातून, किंबहुना नळातूनच पाणी येत, नक्कीच पाणी येत, नळातून पाणी येणं हे सायन्स आहे पण ते बादलीत भरण हे आर्ट आहे, आणि मी नळातून बादलीत पाणी भरल्या शिवाय राहणार,” असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. तसेच उद्धव यांनी महाराष्ट्रातील नियम शिथिल करण्यासंदर्भातील संवादाच्या शेवटी सरकार सुरक्षित असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यावरुन देशपांडे यांनी टोला लगावत नळाचे पाणी भरण्यासंदर्भातील उपहासात्मक ट्विटचा शेवट, “नाही बाकी सरकारला धोका नाही” या वाक्याने केला आहे.

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या गोलगोल फिरुन एकच वाक्य बोलण्याच्या शैलीवर मजेशीर पद्धतीने ट्रोलिंग केलं जात आहे. यामध्ये अगदी दूध आणण्यासंदर्भातील पती पत्नीचे संवाद असो किंवा केस वाढण्यासंदर्भातील वक्तव्य असो, ते गोलगोल फिरवून कसं सांगता येईल याबद्दलच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.





यापूर्वीही उद्धव ठाकरे यांना, “करोना सोबत रहायची आपली तयारी आहे पण करोनाची आपल्यासोबत रहायची तयारी आहे?” या वाक्यावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही करोनासंदर्भातील आर्थिक मदतीची घोषणा करणारे भाषण लांबवल्यामुळे आणि महत्वाचा मुद्दा शेवटच्या काही मिनिटांमध्ये मांडल्यामुळे त्यांनाही ट्रोल करण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या या शैलीची चांगलीच चर्चा रंगली आहे. आपल्या पुढील भाषणामध्ये यावर ठाकरे याचा कसा समाचार घेतात याकडे नेटिझन्सचे लक्ष लागले आहे.