आपल्या मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी असे प्रत्येक वडिलांना वाटते. मुलगा चांगल्या कंपनीत स्थिरस्थावर झाला की आयुष्यातील उरलेली काही वर्षे मजेत आणि शांततेत घालवावी असे प्रत्येक वडीलांचे स्वप्न असते. पण राजस्थानमधील जयपूर जवळच्या सूजातमध्ये राहणारे तेजाराम संखला यांची कहाणी काही वेगळी आहे. त्यांचा मुलगा आज जगातील सर्वात मोठ्या कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला आहे. पण, ऐशोआरामत जीवन जगण्यापेक्षा तेजाराम आजही मोलमजुरी करून अत्यंत साधेपणाने जीवन जगत आहेत.

वाचा : नोटा भरण्यास उशीर झाला कारण…; योगेंद्र यादव यांचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल

तेजाराम संखला यांचा मुलगा रामचंद्र गुगलमध्ये कार्यरत आहे. २०१३ पासून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून गुगलमध्ये कार्यरत आहे. कामामुळे रामचंद्र अमेरिकेतच राहतो. त्याचा वार्षिक पगार जवळपास ३६ लाख आहे. असे असताना त्याचे वडील मात्र अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत आहेत. सूजातमध्ये ते मोलमजुरी करून आपला खर्च भागवतात. एका एक्सपोर्ट कंपनीचे सामान गाड्यांमध्ये लादण्याचे काम ते करतात. दिवसाला त्यांना ४०० रुपये मिळतात. तेजाराम यांना काम करण्याची गरज नाही. पण, तरीही ते काम करुन अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य जगतात. ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत रामचंद्रने सांगितले की ‘आमची परिस्थिती आता नक्कीच सुधारली आहे. त्यांना काम करण्याची अजिबात गरज नाही. पण तरीही त्यांना नुसते बसून खाणे पटत नाही. त्यामुळे ते सतत काहीना काही काम करत असतात.’

वाचा : बांगलादेशी तरुणींच्या मनावर राज्य करतो ‘हा’ तरूण

रामचंद्रच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. सूजातमधल्या एका हिंदी माध्यमिक शाळेतून त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शाळेत असताना त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. पुढे आयआयटी रुडकीमधून त्याने आपले इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. रामचंद्रची फी भरण्याइतके पैसे त्याच्या वडिलांकडे नव्हते तेव्हा त्याच्या वडिलांनी जमीन विकून पैसे गोळा केले होते. इतकेच नाही तर त्याच्या गावतल्यांनी पैसे गोळा करून त्याला लॅपटॉपसाठीही पैसे दिले होते. गुगलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर रामचंद्रने सर्व कर्ज फेडले आहेत. आता भारतात येऊन समाजसेवा करण्याचा त्याचा मानस आहे.