उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडविल्याने देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकले आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देशभरातून दरवर्षी पर्यटक येत असतात. यंदाच्या वर्षीही पर्यटक कुलू, मनाली, कसोल, मंडी आदी भागात पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटक तेथे अडकून पडले आहेत. त्या ठिकाणी दळणवळण बंद झाल्याने ये-जा करणे अशक्य झाले आहे. अशातच पुन्हा एकदा हिमाचलमध्ये ढगफुटी झाली असून मोठं संकट ओढावलं आहे.
गिरी नदीला अचानक आला पूर
हिमाचल प्रदेशातील सिरमौरमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पांवटा साहिबजवळील सिरमौरी तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जवळपास संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली आले आहे. त्याचबरोबर या पुरामुळे एका घरातील ५ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. मात्र, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असून खबरदारी म्हणून गाव रिकामे करण्यात आले आहे. जवळपास ६५ कुटुंबातील लोक रात्री घर सोडून राष्ट्रीय महामार्गावर आले आहेत. या विध्वंसामुळे गावात जाण्यासाठी सर्व मार्ग बंद झाले असून, प्रत्येक मार्गावर मोठमोठे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे बचावकार्यासाठी पथकेही गावात पोहोचू शकत नाहीत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण हे सगळं आपल्या मोबाईलमध्ये शूट करत आहे. यावेळी नदीचा प्रवाह इतका प्रचंड आहे की, तिथे उभं राहणं ही धोकादायक आहे. तरुणांनी अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं मात्र तरीही तरुण वर्ग ऐकताना दिसत नाही.
पाहा व्हिडीओ
दरम्यान ढगफुटीमुळे गिरी नदीलाही पूर आला आहे. गिरी नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. नदीच्या उसळणारं पाणी पाहून स्पष्टपणे अंदाज येत आहे की तिथली परिस्थिती भयानक झाली आहे. यावेळी गिरी नदीने उग्र रूप धारण केले आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्येही परिस्थिती वाईट आहे. संततधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.