शबनम नावाची एक मुस्लिम मुलगी रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला पायी निघाली आहे. मुंबईला राहणारी शबनम २१ डिसेंबरपासून मुंबईहून अयोध्येला चालली आहे. विशेष म्हणजे तिचा हा संपूर्ण प्रवास पायी असणार आहे. तिच्या बरोबर तिचे सहकारी आहेत रमन राज शर्मा आणि विनीत पांडे. शबनमला १४०० किमीहून जास्त अंतर चालत पार करायचं आहे. मात्र रामाच्या दर्शनाच्या आस तिला लागली आहे. शबनम ही मुस्लिम आहे. मात्र तिचं म्हणणं असं आहे राम तर सगळ्यांचा आहे. त्यासाठी हिंदू असणं आवश्यक नाही. एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे.
शबनम आणि तिचे दोन सहकारी रोज तीस किलोमीटर अंतर चालत आहेत. भगवान रामाच्या भक्तीत हे सगळे इतके लीन झाले आहेत की त्यांनी अयोध्येला पोहचण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही. होइही सोइ जो राम रचि राखा! या सूत्राने ते पुढे चालत आहेत.
शबनम च्या पायी दौऱ्याची वैशिष्ट्ये काय?
२१ डिसेंबरला शबनम मुंबईहून निघाली आहे
शबनमसह तिचे दोन सहकारी रमन आणि विनीत आहेत.
एका दिवसात २५ ते ३० किमी अंतर ते चालतात
शबनम मुलगी असल्याने तिला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे
या तिघांच्याही खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था पोलीस करत आहेत.
शबनमने नेमकं या म्हटलं आहे?
राम सगळ्यांचा आहे त्यासाठी हिंदू असण्याची गरज नाही असं शबनमने म्हटलं आहे. शबनम महाराष्ट्रातल्या काही संवेदनशील भागात जेव्हा अडकली तेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढलं. सध्या शबनम आणि तिच्या सहकाऱ्यांची ही पदयात्रा मध्य प्रदेशात पोहचली आहे.
शबनम आणि तिच्या सहकाऱ्यांच्या या पदयात्रेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. शबनमला जेव्हा या अयोध्या वारी बाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली रामाला कुठल्याही एका धर्मात बांधू नका. जो सच्चा आहे त्याचा राम आहे. तसंच मी या यात्रेतून हे सांगू इच्छिते की मुलीही कशात कमी नाहीत. पदयात्रा फक्त पुरुषच नाही तर महिलाही करु शकतात हे मला दाखवून द्यायचं होतं म्हणून मी ही पदयात्रा काढली आहे असंही शबनमने म्हटलं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
शबनम अत्यंत उत्साहात रामाच्या दर्शनासाठी निघाली आहे. तिच्या हातात भगवा झेंडादेखील आहे. सोशल मीडियावर तिच्या या यात्रेवरुन संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणी तिचं कौतुक केलं आहे तर कुणी तिच्यावर यथेच्छ टीका केली आहे. मात्र सगळ्या गोष्टींकडे पाठ करत शबनमने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे.