भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हा मैदानावरील वादांसाठी ओळखला जातो. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने पंचाशी वाद घातला होता. दरम्यान सामन्याच्या तिसर्या दिवशी त्याची अनेक वेळा पंचाशी बाचाबाची झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या प्रयत्नानंतरही हे प्रकरण मिटले नाही, तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविडला हस्तक्षेप करावा लागला.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज अश्विन सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या गोलंदाजीमुळे पंच नितीन मेनन यांना वारंवार त्रास देताना दिसला. अश्विन चेंडू टाकल्यानंतर पंच नितीन मेनन यांच्यासमोरुन जात होता. यावेळी पंचानी त्याला हटकले. अश्विन सतत समोरून जात असल्यामुळे पंचाना चेंडू नीट दिसत नव्हता आणि कोणत्याही प्रकारच्या अपीलवर तो निर्णय देऊ शकत नव्हते.
कशामुळे झाला वाद
अश्विनची फॉलो-थ्रू गोलंदाजी राहिली. अश्विनने या सामन्यात राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो टॉम लॅथमला राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. यादरम्यान अश्विन थेट पंचांसमोर क्रॉसिंग करत होता. यामुळे मैदानावरील पंचांना त्रास होत होता.
७७ व्या षटकात मेननने अश्विनला प्रथमच रोखले आणि त्याच्या फॉलो-थ्रूबद्दल इशारा दिला. यादरम्यान या सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणेही अश्विनसोबत मेननशी बोलताना दिसला. पंचांकडे अश्विनच्या दोन तक्रारी होत्या. पहिली होती की अश्विन धोक्याच्या भागात येत होता. पण टीव्ही रिप्लेमध्ये हे स्पष्ट होतं की धोक्याच्या भागात येण्यापूर्वी तो अतिशय हुशारीने क्रास करत होता. दुसरे म्हणजे, अश्विन समोर आल्याने पंचाना चेंडू पाहणे अवघड जात होते.
राहुल द्रविडने केला हस्तक्षेप
हे सर्व मैदानावर सुरू असताना आणि प्रकरण गंभीर बनले. अंपायर नितीन अश्विनला वारंवार थांबवत होते. हे सर्व पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड थेट मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांना भेटायला गेले. द्रविड रेफरीशी बोलून तो परत आल्यानंतर अंपायर आणि अश्विन यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.