भारताचं भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सध्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी लोकशाहीच्या दृष्टीने कसे साक्षर होतील, यासाठी कायमच चर्चा केल्या जातात. शहरी भागात हे प्रमाण जास्त असून ग्रामीण भागात किंवा दुर्गम आदिवासी भागात ते जास्त असल्याचं देखील सांगितलं जातं. पण आदिवासी भागातून येणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये देखील लोकशाही प्रक्रिया आणि आपल्या अधिकारांविषयी जागृती होत असल्याचं ठळकपणे दाखवून देणारा एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका शाळकरी मुलीनं प्रशासनाला ठणकावल्याचा हा व्हिडीओ असून नेटिझन्स या मुलीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

व्हायरल व्हिडीओतील मुलगी निर्मला चौहान

हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या झाबुआमधला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव निर्मला चौहान असं आहे. ही मुलगी अलिराजपुल जिल्ह्याच्या खंडाला खुशाल गावातील आदिवासी भागातील रहिवासी आहे. निवास भत्ता, शिष्यवृत्ती आणि बसच्या भाड्यामध्ये सूट मिळावी, यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये निर्मला चौहान देखील सहभागी झाली होती. पण जिल्हाधिकारी त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे या मुलीनं तिथल्या तिथे प्रशासनाला स्पष्ट शब्दांत ठणकावलं.

नेमकं झालं काय?

या विद्यार्थिनींना बाहेरच थांबवून ठेवण्यात आलं होतं. सुमारे तासभर वाट पाहूनही जिल्हाधिकारी बाहेर न आल्यामुळे संतप्त झालेल्या निर्मला चौहाननं प्रशासनालाच स्पष्ट शब्दात ठणकावलं. “नाहीतर मला कलेक्टर बनवा. मी कलेक्टर बनायला तयार आहे. सगळ्यांच्या मागण्या मी पूर्ण करून टाकेन सर तुम्हाला शक्य होत नसेल तर. सरकार कुणासाठी बनलं आहे? दणूकाही आम्ही भीक मागण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हा गरीबांसाठी तरी काहीतरी व्यवस्था करा सर. आम्ही आदिवासी लोक इतक्या लांबून गाडीभाड्याचा खर्च करून येतो”, असं ही मुलगी ठणकावून सांगत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

का झाला मुलीचा संताप?

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेमका आपला संताप का झाला या विषयी तिने दैनिक भास्करशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘”हे अधिकारी जनतेसाठी आहेत पण आमचंच ऐकत नाहीत. हे लोक ५ मिनीट उन्हात उभं राहू शकत नाहीत आणि आम्ही दोन ते तीन तासांपर्यंत उन्हात तिथे निदर्शन करत त्यांना बोलवत राहिलो. ते आमचं म्हणणं ऐकायला आले नाहीत म्हणून संताप झाला”, असं निर्मलानं बोलाना सांगितलं.