वसई : विरारच्या टोटाळे तलावात २७ वर्षीय तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली असून तलावात बुडालेल्या तरुणाचा अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे. सुबोध कुमार असे या तरुणाचे नाव असून दारूच्या नशेत असल्याने असे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

विरार पूर्वेच्या आकाश मार्गिकेवर दुपारच्या सुमारास सुबोध कुमार आणि त्याचा चुलत भाऊ उभे होते. सुबोध कुमार याने मद्यपान केल्याने नशेत होता. त्यावेळी त्याने भावाला उन्हाच्या उकाड्याने गर्मी होत असल्याचे सांगत थेट तलावात उडी मारली. त्यापाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी त्याच्या चुलत भावाने ही उडी मारली. मात्र सुबोध पोहता पोहताच अचानक पाण्यात बुडाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला व विरार पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून पाण्यात बुडालेल्या सुबोध याचा शोध सुरू आहेत. सहा तास उलटून गेले तरीही त्याचा शोध लागला नसल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे. नेमकी गर्मीचे कारण होते अन्य काही कारण हे पुढील तपासानंतरच पुढे येईल.