विरार : विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात खासगी बस वाहतूक व्यावसायिकांनी रस्त्यात बस उभ्या करून रस्ते गिळंकृत केले होते. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. लोकसत्ताने यासंदर्भात नागरिकांची व्यथा मांडली होती. त्या बातमीची दखल घेत प्रशासनाने मंगळवारी परिवहन विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईने रस्ते मोकळे केले आहेत. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा तलाव परिसरात खासगी बससेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. मुंबई, बोरिवली, मीरा-भाईंदर या परिसरात त्यांच्या बस उभ्या करण्यासाठी जागा दिल्या जात नसल्याने अनेक व्यावसायिकांनी आपल्या मोठमोठय़ा बस मनवेलपाडय़ातील रस्त्यांवर उभ्या करण्यास सुरुवात केली. तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात जवळपास २००हून अधिक बस उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे रस्ताच व्यापला जाऊन रहिवाशांना ये-जा करण्यासही जागा उरली नव्हती. या बस धुण्याची, तसेच चालकांचे जेवण बनविण्याची, बस दुरुस्तीची कामेसुद्धा याच रस्त्यावर होत होती. यामुळे रस्ते निसरडे होऊन दुचाक्या घसरण्याच्या घटना घडल्या होत्या. रात्रीच्या वेळी बसच्या आडोशाला मद्यपी आणि नशेकऱ्यांनी ठाण मांडल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांच्या तक्रारींची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. ‘लोकसत्ता’ने बातमी केल्यानंतर परिवहन विभाग, महानगरपालिका यांनी कारवाई करून सर्व बस हटवल्या. या वेळी शेकडो बसधारकांवर दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाई पुढील आठवडाभर सातत्याने केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.