उपप्रादेशिक परिवहन विभागाचा निर्णय वसई: उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध प्रकारच्या कारवायामध्ये वाहने जप्त केली आहेत. मात्र ही वाहने नेण्यासाठी त्यांचे मालक समोर येत नसल्याने वाहने कार्यालयाच्या आवारात पडून आहेत.त्यामुळे आता या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास तीनशेहून अधिक वाहनांचा लिलाव होणार आहे. वसई उपप्रादेशिक विभागाकडून नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर अधूनमधून कारवाई केली जाते. तर काही कारवायांमध्ये वाहने उचलली जातात. यात ट्रक, रिक्षा, बस व इतर वाहनांचा समावेश आहे. यातील काही वाहनचालक हे वाहने घेऊन जाण्यास परत येत नाहीत. त्यामुळे ही वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या समोर पडून आहेत. यातील काही वाहने गंजून गेली आहेत. या वाहनांच्या मालकांशी संपर्क करूनही पुढे येत नाही. मध्यंतरी या वाहनांचे साहित्यही चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. तर दुसरीकडे या वाहनांमुळे जागाही मोठय़ा प्रमाणात अडवली जात आहे. या वाहनांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता परिवहन विभागाने कारवाईत उचलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया ही परिवहन विभागाने सुरू केली आहे. या लिलावात जवळपास ३०० ते ३५० इतक्या वाहनांचा समावेश आहे असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. वाहनधारक वाहने नेण्यासाठी येत नसल्याने कारवाईत पकडण्यात आलेली वाहने ही वाहने वर्षांनुवर्षे पडून आहेत.त्यामुळे आता या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. - प्रवीण बागडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.