वसई : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वसईतील समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अशा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनारी टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. मात्र अर्नाळा येथील किनाऱ्यावर उभारलेल्या मनोऱ्यांमध्ये  टेहळणीसाठी जीवरक्षकांची नेमणूकच करण्यात आलेली नाही. परिणामी मनोरे असूनही पर्यटकांची सुरक्षा गटांगळय़ा खात आहे.

विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारा निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी होते. अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्रात खोलवर जातात व नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने जीव धोक्यात घालतात.  या ठिकाणी किनारा आणि समुद्राची टेहळणी करण्यासाठी मनोरा उभा करण्यात आला आहे. दूरवर धोक्यात असलेल्या एखाद्या मानवीजीवाला हेरून तातडीने मदत पोहोचवता यावी, असा या मनोऱ्यांचा उद्देश असतो. मात्र, या मनोऱ्यांवर टेहळणीसाठी जीवरक्षकच नाहीत. उलट हा मनोरा आता मद्यपी आणि गर्दुल्ले यांचा अड्डा बनू लागला आहे.

अशा ठिकाणी पर्यटकांना सावध करण्यासाठी लाल बावटे व किंवा धोकादायक स्थिती दर्शविणारे फलक असणे गरजेचे आहे. तेही नसल्याने अधूनमधून या भागातही पर्यटक बुडण्याच्या घटना घडतात. त्यातच जीवरक्षक तैनात नसल्याने पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

टेहळणी मनोऱ्यांचीही दुर्दशा

समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अर्नाळा किनाऱ्यावर टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचीही दुर्दशा होऊ लागली आहे. सध्या स्थितीत या टेहळणी मनोऱ्यावरील एका बाजूचे छप्पर उडाले आहे. या मनोऱ्यांत मद्यपींच्या मेजवान्या होतात. त्यामुळे येथे नेहमी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात.