वसई: चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी सोमवारी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासांहून अधिक  या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघात ही घडतात. तर दुसरीकडे धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र तरीही या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आता तर पावसाळा सुरू झाला आहे तरीही रस्त्याची अवस्था बिकटच आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिंचोटी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात शेकडो संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक, वाहन चालक यात सहभागी झाले होते.  मागील अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत. परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.

चिंचोटी-कामण-भिवंडी हा दोन जिल्हाला जोडणारा महत्वाचा महामार्ग असून मागील अनेक वर्षापासून तो नादुरुस्त आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे फार धोकादायक झालेले आहे. या रस्त्यावरती लहान मोठे असे शेकडो अपघातही झालेले आहेत. परंतु सातत्याने मागणी होऊनही अत्यंत महत्वाचा रस्ता आजपर्यंत दुरुस्त झालेला नाही. रस्त्याचे नूतनीकरण होणार म्हणून अनेक वेळा घोषणा झाली, कॉंक्रिटिकरणं होणार म्हणून ही घोषणा झाल्या परंतु काँक्रिटीकरणाच्या नावाखाली चार-पाच ठिकाणी कॉक्रिटीकरणाचे कामही चालू झाले, आणि ते काम आजपर्यंत पूर्ण झालेच नाही असे आंदोलनकर्ते समीर वर्तक यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही येथील नागरिक व येथून ये जा करणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. यासाठी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे असेही वर्तक यांनी सांगितले. दोन तासाहून अधिक काळ आंदोलन कर्त्यानी महामार्ग रोखून धरल्याने वसईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.