ऐनवेळी लशींचे वेळापत्रक जाहीर केल्याने नागरिकांच्या हालात भर

वसई : लोकल  प्रवास करण्यासाठी लशींच्या दोन्ही मात्रा आवश्यक असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहेत. त्यातच आता पालिकेने ऐनवेळी लशींचे वेळापत्रक जाहीर करायला सुरूवात केल्याने मोठा गोंधळ उडत असून नागरिकांच्या त्रासात भर पडतच आहे.

करोना टाळेबंदीचे नियम शिथील करताना राज्य शासनाने लशींच्या दोन्ही मात्रा असतील तरच लोकल  मध्ये प्रवासाला परवानगी दिली आहे. याशिवाय मॉलमध्ये देखील प्रवेश करायचा असेल तर लशींच्या दोन्ही मात्रा असणे गरजेचे असल्याचा नियम काढला आहे. यामुळे नागरिक लस मिळविण्यासाठी धडपड करत आहे. शनिवारी देखील वसई विरारच्या सर्वच लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी पहायला मिळाली. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील नियोजनाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. पालिकेने रविवारी सकाळी एनेवळी लशींचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे नागरिकांची गर्दी उडाली. लशींच्या भरपूर मात्रा पालिकेला मिळाल्या होत्या. परंतु त्या पहिल्या फळीतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक यांना प्राधान्य देणार असे सांगितले. त्यामुळे नेमक्या लशी कुणाला मिळतील याबाबत संभ्रम निर्माण झाला आणि रविवारी देखील नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. सोमवारी देखील रात्री उशीरा पालिकेने लशीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र सोमवारी केवळ महिलांसाठी लस उपलब्ध असेल असे सांगितले.

दुसरीकडे ग्रामीण भागातील ढिसाळ नियोजन दिसले. जिल्हाधिकायांनी वसईतील काही केंद्रावर लशी उपलब्ध राहतील असे आदल्या दिवशी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर लशी आल्याच नव्हत्या. आगाशी केंद्रावर २०० लशी मिळतील असे सांगितले होते. परंतु लस आल्याच नसल्याचे केंद्रातील सांगितले. हा प्रकार स्थानिक नागिरक महेश भोईर यांनी जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसळ यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लशी उपलब्ध करून देण्यात आल्या.

आरोग्य अधिकारी डॉ वाळके यांना  निलंबित करण्याची मागणी

वसई विरार महापालिकेतील सावळा गोंधळ आणि नियोजनाअभावी नागिरकांचे हात होत आहेत. यासाठी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा वाळके जबाबदार असून त्यांना तात्काल निलंबित करा अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अनेकांना प्रमाणपत्र न घेता लशी मिळत आहेत हा प्रकार गंभीर असल्याचे लाड यांनी सांगितले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.