वसई : रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत मागील पाच महिन्यात मोबाईल चोरीचे १८० गुन्हे घडले आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.याच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा भुरट्या चोरांनी घेतला आहे. मोबाईल चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.
विशेषतः गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत.विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. चोरीच्या घटनांमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात करीत आहेत.
आतापर्यंत मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांच्या दरम्यान १८० इतक्या मोबाईल चोरी होण्याच्या घटनांची नोंद केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा असे उपक्रम राबविले जात आहेत असेही रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
रेल्वेत ही चोरीच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः पाकीट मारी आणि मोबाईल या चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेतली पाहिजे.भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई रेल्वे
सीसीटीव्ही फायदेशीर
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकात गस्त जरी घालत असली तरी अनेक घटना पटकन नजरेस पडत नाहीत.त्यामुळे रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकप्रकारे तिसरा डोळा म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे सोपे जाते. त्यामुळे बहुतांश गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश येत आहे.