वसई : मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात पूरस्थितीची निर्माण होऊ लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेकडून शहरात धारण तलाव (होल्डिंग पोन्ड्स) विकसित केले जाणार होते. यासाठी नालासोपारा निळेमोरे येथे जागाही निश्चित केली होती. मात्र अजूनही धारण तलाव विकसित करण्यात आले नसल्याने शहरातील पूरस्थितीची समस्या कायम राहिली आहे.
वसईत दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण, बेकायदा माती भराव व नियोजनशून्य पद्धतीने बांधण्यात आलेली बांधकामे यामुळे शहरात मागील चार ते पाच वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात पुन्हा एकदा वसई-विरार शहर हे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरले, ये-जा करण्याचे मार्ग बंद झाले याचा मोठा फटका वसई-विरारमधील नागरिकांना बसला आहे.
पूरस्थिती नियंत्रणात यावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या संस्थांची मिळून सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये व पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) विकसित करणे यासह इतर पाणी निचरा होण्याचे मार्ग खुले करावेत अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर पालिकेने नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे सव्र्हे क्रमांक १७९, हिस्सा न १ /ड या जागेवर १९ हजार ८६०. ६४ चौरस मीटर इतके क्षेत्र धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड्स ) यासाठी आरक्षित करण्यात आले होते. मात्र अजूनही त्यावर कोणत्याच प्रकारे धारण तलाव तयार करण्यात आले नाही. सद्य:स्थितीत त्या जागेवर केवळ सूचना फलक व तारांचे संरक्षण जाळी मारून ठेवण्यात आले.
पूरस्थिती नियंत्रणासाठी पालिकेने निरी व आयआयटी यांनी सुचविल्यानुसार धारण तलावासाठीच्या जागा निश्चित केल्या व त्याबाबत संबंधित विकासकांना टीडीआरसुद्धा दिला मात्र अजूनही त्या ठिकाणी धारण तलाव तयार केले नसल्याने शहरातील पूरस्थिती कायम असल्याचे पर्यावरण समितीचे समीर वर्तक यांनी सांगितले आहे. तसेच पूरस्थितीच्या उपाययोजनांच्या संदर्भात पालिका उदासीन असल्याने शहरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता ज्या जागा धारण तलावासाठी निश्चित आहेत. त्यावर भविष्यात इतर कोणी अतिक्रमण केले तर याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्नही वर्तक यांनी उपस्थित केला आहे.
पूरस्थितीसंदर्भात निरी व आयआयटी यांनी जो अहवाल दिला आहे. त्यानुसार शहराचे नियोजन करावे. तसेच नैसर्गिक पाणी जाण्याच्या जे अतिक्रमण आहे ते बाजूला करून मार्ग मोकळे करावेत आणि पावसाचे जे पाणी जाण्याचे मार्ग आहेत त्यांची विकास आराखडय़ात नोंद करून त्याच्या आजूबाजूला कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये.
– समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती