वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणाचे काम सुरू आहे.मात्र या कामादरम्यान बॅरिगेट व इतर साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, मीरा भाईंदर या शहरासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर पावसाळ्यात पडणारे खड्डे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाने १२१ किलोमीटरचा महामार्गाचे काँक्रिटिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर हे काम सुरू आहे.सद्यस्थितीत हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु या कामाच्या वेळी नियोजन न केल्याने आता महामार्गावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हेही वाचा >>>मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला विशेषतःमहामार्गावर काँक्रिटीकरण कामा दरम्यान वापरण्यात येत असलेले साहित्य सुद्धा काम संपल्यानंतर जागच्या जागी पडून असते. यात गोणी, सिमेंटचे ठोकले, ब्लॉक, लोखंडी साहित्य असे सर्व साहित्य पडून असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. याशिवाय रस्त्याच्या मध्येच हे साहित्य असल्याने प्रवास करताना अपघात होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.तर जे सिमेंटचे ठोकले लावले आहेत ते दूर च्या अंतरावर आहेत. त्याला रेडियम सुद्धा लावले नसल्याने रात्रीच्या सुमारास दिसून येत नाहीत त्यामुळे अपघात घडत आहेत असे वाहनचालकांनी सांगितले आहे. वाहतूक नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून कामाच्या दरम्यान योग्य ते नियोजन न केल्याने वाहतूक नियमन करताना महामार्ग वाहतूक पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. त्यातच महामार्ग प्राधिकरणाने नेमलेले ठेकेदार कामाच्या दरम्यान साहित्य जागीच टाकून देत आहेत. ते साहित्य वाहतुकीला अडसर येत असल्याने वाहतूक पोलिसांना ते बाजूला करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावर अपघात घडत आहेत. यासाठी उपाययोजना कराव्यात याबाबत महामार्ग पोलिसांनी प्राधिकरणाला पत्र दिले आहे. परंतु त्यावर अजूनही कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे चिंचोटी महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी सांगितले आहे.