वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथील एका रिसॉर्ट मधील तरणतलावात बुडून आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दिक्षांत हरिजन असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा तरणतलावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई विरारच्या समुद्र किनार पट्टीवर मोठ्या संख्येने रिसॉर्ट उभे राहिले आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या भागातील रिसॉर्ट मध्ये येऊ लागले आहेत.
मंगळवारी मुंबईच्या गोरेगाव संतोष नगर येथे राहणारे व्यकंटेश हरिजन हे आपले कुटुंब आणि मित्रांसह विरार अर्नाळा येथील ड्रिमलॅण्ड रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आले होते. सकाळी नाष्टा केल्यानंतर सर्वजण रिसॉर्टच्या जलतरण तलावात उतरले. त्यावेळी त्यांचा मुलगा दिक्षांत हरिजन हा लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावातील पाण्यात खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात बुडाला त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याला श्वास गुदमरला. तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे. यापूर्वी सुद्धा वसई विरार भागातील तरणतलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या तरणतलावात झालेल्या मृत्यूच्या घटनेमुळे पुन्हा एकदा तरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिसॉर्ट ठिकाणी झालेल्या मृत्यूच्या घटना
२९ मे २०२४रानगाव समुद्रकिनार्यावर एचडी नावाच्या रिसॉर्ट मध्ये समीक्षा जाधव (७) या चिमुकलीचा बुडून मृत्यू ९ मे २०२४ वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्ट मध्ये असलेल्या तरणतलावात बुडून रिद्धी माने या १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.