भाईंदर:-मिरा भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे साहित्य चोरीला जात असून, त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर शहराचे सुशोभीकरण व्हावे म्हणून तीन वर्षांपूर्वी गोल्डन नेस्ट चौकात महापालिकेने सेल्फी पॉईंट उभारला होता. माजी नगरसेविका स्नेहा पांडे यांच्या निधीतून या सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली असून, त्यावर ‘आय लव्ह मिरा भाईंदर’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने जवळपास दहा लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच या पॉईंटला नियमित वीज आणि पाण्याचा पुरवठा दिला जात आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडून सेल्फी पॉईंटच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या सेल्फी पॉईंटचे साहित्य चोरीला जात आहे तसेच उरलेल्या सामानाचीही दुरवस्था होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या पॉईंटवरील साहित्य मोडून पडू लागले आहे. परिणामी, शहराच्या सौंदर्यासाठी उभारलेले हे पॉईंट आता मुख्य चौकात विद्रूप दिसत असून, सौंदर्यावर डाग लावत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. शहरातील सेल्फी पॉईंटची देखभाल आणि दुरुस्ती करावी, किंवा ते हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेचे दुर्लक्ष

मिरा भाईंदर शहरातील सेल्फी पॉईंटची देखभाल व दुरुस्ती सुरळीतपणे व्हावी म्हणून महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शहरातील सेल्फी पॉईंटची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे, “त्या निर्णयाचे काय झाले?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच सेल्फी पॉईंटमुळे चिमुकलीने गमावले प्राण:

गोल्डन नेस्ट येथील सेल्फी पॉईंटजवळ ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मेहशरजहाँ मुकेरी ही मुलगी आपल्या वडिलांसोबत आली होती. मात्र, त्यावेळी सेल्फी पॉईंटच्या उघड्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी (७ नोव्हेंबर २०२४ रोजी) तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. मेंदूमधील रक्तप्रवाह थांबल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जीवासाठीही धोकादायक ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.