भाईंदर : ठाणे लोकसभा जागेसाठी भाजप उमेदवार संजीव नाईक यांच्या नावाची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा मिरा भाईंदर मध्ये रंगु लागली आहे. त्यात आता पुत्र संजीव नाईकच्या पाठीशी जनसमुदाय उभा करण्यासाठी खुद गणेश नाईक प्रयत्न करत असून त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साद घालण्यास सुरुवात केली आहे. ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद सुरु झाला आहे. या क्षेत्रात वाढलेली पक्ष संघटना पाहता ही जागा भाजपच्या वाटेला यावी, म्हणून देवेंद्र फडवणीस आग्रही आहेत. तर अनेक वर्षांपासून या जागेवरून शिवसेना उमदेवार निवडून येत असल्याने यंदाही या ठिकाणी शिवसेनाच उमदेवार देण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत. दरम्यान भाजप पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळाणार या आशेने माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रत्यक्ष प्रचारास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे नाईक यांना मिरा भाईंदर मधील भाजपकडून जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. तर शिवसेनेकडून संभाव्य उमदेवार ठरू शकत नसल्याने शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली आहे.

हेही वाचा : नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

आता संजीव नाईक यांचा या जागेवरील दावा अजून प्रबळ व्हावा, म्हणून खुद्द गणेश नाईक देखील मैदानात उतरले आहेत. गणेश नाईक यांनी २०१४ पूर्वी दोन वेळा ठाणे जिल्हाचे पालकमंत्री पद भूषवले होते. या काळात त्यांनी आपल्या समर्थकांची मोठी फौज उभी केली होती. परंतु मोदी लाटेनंतर गणेश नाईक यांची मिरा भाईंदरवरील पकड हळूहळू कमी होऊन बहुतांश समर्थकांनी भाजप पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. सध्या गणेश नाईकांनी देखील भाजप पक्षाची साथ पकडली आहे. त्यामुळे मिरा भाईंदर मधील भाजप पक्षातल्या आपल्या जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि अन्य पक्षातील आपल्या जुन्या समर्थकांना गणेश नाईक संपर्क साधून आगमी निवडणुकीत पुत्र संजीव नाईकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन करत आहे. यामुळे ठाणे लोकसभेची जागा ही भाजपच्याच वाटेला गेली, असा संशय सर्वत्र निर्माण झाला आहे.

हेही वाचा : महिला प्रवाशाने घेतला महिला तिकिट तपासनिसाचा चावा, वसई रोड रेल्वे स्थानकातील घटना

गणेश नाईक यांचे आम्ही पूर्वीपासून उघडपणे समर्थक राहिलो आहोत. आता महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्यासाठी त्यांनी आम्हाला संपर्क साधून विनंती केली आहे. त्यानुसार पूर्ण ताकतीने हे काम आम्ही करत आहोत.

ध्रुव किशोर पाटील (माजी वरिष्ठ भाजप नगरसेवक)