वसई: विरार पश्चिमेच्या बोळींज खारोडी येथील मुख्य रस्त्या लगत असलेल्या झाडांच्या थेट मुळांवर कॉंक्रिटिकरण केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या काँक्रिटीकरणामुळे येथील झाडांना धोका निर्माण झाला आहे तर दुसरीकडे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्गही बंद झाले आहेत.

विरार पश्चिमेच्या भागातून विरार ते आगाशी असा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्याच्या कडेला महापालिकेने वृक्ष लागवड केली आहे. मात्र बोळींज खारोडी येथील भागात सुगंधी हाईट्स या इमारतीच्या समोर कॉंक्रिटीकरण करण्यात आले असल्याचा प्रकार समोर आले आहे. करण्यात आलेले काँक्रिटीकरण थेट झाडांच्या मुळांवर करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. झाडांना पोहचण्यास ही जागा शिल्लक राहिली नाही त्यामुळे ही मोठी झालेली झाडे मृत होण्याची शक्यता आहे.

विशेषतः जे काँक्रिटीकरण केले आहे झाडांच्या सोबतच नागरिकांना ये जा करण्यासाठी असलेल्या फुटपाथवर केले आहे. त्यामुळे ये जा करण्याचा मार्ग ही बंद झाला आहे. नागरिकांना व मॅट्रिक्स शाळेतील मुलांना मुख्य रस्त्यावरून ये जा करावी लागते. कधी कधी वाहनांची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे असे सामाजिक कार्यकर्ते आशिष कदम यांनी सांगितले आहे. याबाबत आशिष कदम यांनी प्रभाग समिती ए च्या सहायक आयुक्ताकडे तक्रार केली असून सदरचे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद

बोळींज खारोडी येथील अतिक्रमणामुळे पावसाचे पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग ही बंद झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी हे मुख्य रस्त्यावर साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी ते अतिक्रमण हटवून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्षात जागेवर पाहणी करण्यासाठी संबंधित ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पाठवून तेथील अतिक्रमण हटविले जाईल. – दीपक सावंत, उपायुक्त (अतिक्रमण) महापालिका