वसई: शहरातील वाहनतळांच्या अभावामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बस आगाराच्या जागा मोकळ्या आहेत. या मोकळ्या जागा विकसित करून वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे त्यामुळे शहरातील वाहन तळाचा प्रश्न सुटणार आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यासोबतच शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे.

परंतु वाहने उभी करण्यासाठी  वाहनतळ नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. अनेक भागात वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात आहेत.त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात तर काही वेळा फुटपाथ व रेल्वे स्थानक परिसर अशा भागात उभी केली जात असल्याने नागरिकांना ये जा करण्यास अडचणी येतात. त्यातच ही वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहने उभी करायची तरी कुठे असा प्रश्न निर्माण होतो.

तर दुसरीकडे महापालिकेची परिवहन सेवा विस्तार असली तरी त्यांच्या बसेस उभ्या करण्यासाठी जागा मिळत नसल्याने रस्त्यावर उभ्या राहतात. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे आहे. पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्न  दिवसेंदिवस अधिकच जटिल बनू लागला आहे. यासाठी यातून तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.

एसटी आगाराच्या नालासोपारा, वसई, नवघर अशा जागा मोकळ्या आहेत. विशेषतः यातील काही जागा रेल्वे स्थानक परिसराला लागून असल्याने वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा नागरकांना होणार आहे. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी प्रश्न उपस्थित करून या मोकळ्या जागा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वार विकसित करण्यात याव्यात अशी मागणी केली होती.

एसटीच्या उत्त्पन्न वाढीस मदत होईल

एसटी महामंडळ उत्त्पन्न वाढीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील एसटी आगाराच्या मोकळ्या जागा आहेत त्या विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. यात वाहतूक कोंडी व वाहनतळ प्रश्न सुटेल तर दुसरीकडे एस.टी. महामंडळाला अतिरिक्त महसूलही मिळणार आहे.

आगारात बेकायदेशीर पार्किंग  

नवघर आणि नालासोपारा या आगारातून लांब पल्याच्या गाड्या वगळता शहरा अंतर्गत सेवा बंद झाली आहे. त्यामुळे या आगारातून सुटणाऱ्या एसटी गाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे एसटी आगाराच्या जागा या मोकळ्या राहत आहेत. या मोकळ्या जागेत काही खासगी वाहनधारक येऊन बेकायदेशीर पणे वाहने पार्किंग करून निघून जातात.त्यामुळे काही वाहतुकीला अडथळे येतात.तर काही वेळा काही गैरप्रकार ही आगार परिसरात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

शहरात पार्किंगची समस्या मोठी आहे. एसटी महामंडळाच्या आगराच्या जागा आहेत त्या विकसित करून पार्किंग साठी उपलब्ध करून दिल्या जातील. लवकरच त्याचे भूमिपूजन केले जाईल.- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री