वसई-विरार शहरवासीयांचा अपघातांचा धोका कायम; विरार पूर्व, नालासोपारा, माणिकपूर, सोपारा गाव अशा अनेक ठिकाणी गटारांची दुरवस्था वसई : शहरातील उघडय़ा गटारांचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. पावसाळ्यात अनेक दुर्घटना होऊनही अजूनही शहरातील विविध ठिकाणची गटारे उघडीच आहेत. मागील तीन महिन्यांपासून पालिकेतील गटाराची झाकणे संपली आहेत. ठेकेदाराकडून हा पुरवठा होत नसल्याने झाकणांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वसई-विरार परिसरात महानगरपालिकेने रस्ते बांधताना रस्त्याच्या दुतर्फा पदपथ बांधले आहेत. हे पदपथ मुख्य गटाराच्या वाहिनीवर बांधले आहेत. यामुळे या पदपथावर ठरावीक अंतरावर गटाराचे चेंबर तयार केले आहे; पण अनेक ठिकाणी ही झाकणे तुटली, फुटली, चोरीला गेली आहेत, तर काही ठिकाणी ही झाकणे बसवलेलीच नाहीच. या पदपथावरील गटाराची झाकणे गायब असल्याने या पदपथावर चालणे मोठे धोकादायक बनत आहे. रात्रीच्या वेळी यामुळे अनेकांना या उघडय़ा गटाराचे बळी ठरावे लागते. वसई-विरारमधील बहुतांश परिसरांतील गटारांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत, तर अनेक ठिकाणी तुटलेली आहेत. पदपथावर असलेले चेंबर फुटले, तुटलेले आहेत. या पदपथावरून पादचारी ये-जा करणारे नागरिक रस्त्यांवरून ये-जा करू लागले आहेत. अनावधानाने नागरिकांचे गटारात पाय जाऊन दुर्घटना घडू शकते. पावसाच्या पाण्यामुळे उघडी गटारे कित्येकदा दिसून येत नाहीत. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. तरीसुद्धा वसई-विरार महानगरपालिका त्यावर दुर्लक्ष करीत आहे. पालिका अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त प्रश्न स्थानिक विचारत आहेत. विरार पूर्व येथील सेंट पीटर शाळेजवळ रस्त्याच्या दुतर्फा मोठी गटारे आहेत. ही गटारे बंदिस्त करून त्यावर पदपथ बांधण्यात आला आहे. यामुळे दररोज शेकडो नागरिक याचा वापर करतात. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर एकूण ५४ चेंबरवर झाकणे नाहीत. यामुळे अनेक वेळा नागरिक गटारात पडून अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशी काही उदाहरणे आहेत ज्या ठिकाणी उघडी गटारे नागरिकांना धोकादायक ठरत आहेत. विरार पूर्व येथील आर. जे. नगर, आइस फॅक्टरी, नाना नानी पार्क, सेंट पीटर हायस्कूलजवळ, मनवेल पाडा, नालासोपारा टाकी रोड, महेश नगर, ओस्वाल नगरी, प्रगती नगर, तुळींज, आचोळे, पश्चिमेला बस स्थानक रोड, पाटणकर पार्क, लक्ष्मी बेन छेडा मार्ग, समेळ पाडा, सोपारा गाव, वसईतील एव्हरशाइन नगर, वसंत नगरी, माणिकपूर, दिवाणमान इत्यादी परिसरांत असलेल्या गटारांची दुरवस्था आहे. पालिकेकडे गटाराची झाकणेच उपलब्ध नसल्याने या गटारांची दुरुस्ती अशीच थांबली आहे. यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे ज्या ठिकाणी गटारांची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणची पाहणी करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत. ठेकेदाराला झाकणांची मागणी नोंदवली आहे. लवकरच झाकणे आली की, गटारांचे काम केले जाईल. - राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, वसई-विरार महानगरपालिका