भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात सर्रासपणे अमली पदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांकडे केली आहे.
मिरा भाईंदर शहरात ही अमली पदार्थ तस्करी होण्याचे प्रकार वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी हटकेश येथील ‘माफिया’ नावाच्या क्लबजवळ अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या संशयितांना काशिगाव पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अवघ्या दोन तासांतच कोणतीही ठोस कारवाई न करता या संशयितांना मुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर, शनिवारी मंत्री सरनाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.या प्रसंगी त्यांनी सांगितले, “मिरा-भाईंदर हे झपाट्याने विकसित होणारे शांतताप्रिय शहर आहे. येथे जर खुलेआम अमली पदार्थाचा व्यवहार चालू असेल, तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. अशा प्रकारांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. संबंधित आरोपींवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवरही चौकशी करून कारवाई केली जावी,” अशा सूचना सरनाईक यांनी पोलिसांना केल्या आहेत.