भाईंदर – मिरा भाईंदर महापालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्यालयात आधुनिक यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या यंत्रणेनुसार महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक विशेष ‘व्हिजिटर कोड’ दिला जाणार आहे.

महापालिकेला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून हे नागरिक विविध समस्या घेऊन येतात. अनेकदा या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणे आवश्यक असते. त्यामुळे या नागरिकांना योग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच मुख्यालयात माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र तरीही नागरिकांना अधिकारी वेळ देत नसल्यामुळे किंवा अनावश्यकपणे इतर अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागत असल्यामुळे अडचणी येत आहेत. परिणामी, अनेक नागरिक आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर भेटीसाठी रांगा लावतात. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता निर्माण होते.

या समस्येवर उपाय म्हणून आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांना ‘व्हिजिटर कोड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रथम नागरिकांना आपली तक्रार घेऊन संबंधित विभागप्रमुखांना भेटावे लागेल. त्यानंतरही तक्रारीचे निवारण न झाल्यास उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागेल. शेवटी, गरज असल्यास आयुक्तांची भेट घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेत तक्रार व त्यावर दिलेल्या उत्तरांची नोंद ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. आणि ती माहिती यंत्रणेत संकलित केली जाईल. यामुळे आयुक्तांना प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल व नागरिकांच्या मूळ समस्येची माहिती आधीच मिळू शकेल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर आयुक्तांनीच केला प्रयोग

मिरा भाईंदर महापालिकेत ही यंत्रणा राबवण्यापूर्वी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी आपल्या कार्यालयात याबाबत प्रायोगिक प्रयोग केला होता. मागील दोन महिन्यांत २२१ नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली असून त्यातील १३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. ४५ तक्रारींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून उर्वरित ५६ प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे लवकरात लवकर समाधान करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच ‘व्हिजिटर कोड’ ही यंत्रणा विकसित केली जात आहे.” – राधा बिनोद शर्मा -आयुक्त (मिरा भाईंदर महानगरपालिका)