भाईंदर :-मिरा भाईंदर शहराच्या आदिवासी पाड्यात तसेच दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात विंधन विहीरी (बोअरवेल )उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पाणी टंचाईची समस्या मार्गी लागून येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिरा भाईंदर शहरात एकूण १६ आदीवासी पाडे आहेत.या पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातुन आपली पाण्याची गरज भरून काढली जात आहे.मात्र उन्हाळ्यात येथील विहिरी व लहान नद्या कोरड्या पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची दाट समस्या जाणवते.त्यामुळे नागरिकांची ही गरज भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे.
मात्र काही पाड्यांमध्ये व शहरातील काही दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात टॅंकरने पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत नाही. तसेच याठिकाणी जलवाहिनी अंथरण्यास देखील अडचणी येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पाण्याची गरज भरून काढण्यासाठी विंधन विहिरीची उभारणी करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.यासाठी जवळपास ५२ लाख रुपयांच्या आर्थिक खर्चास आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी प्रशासकीय ठराव करून मंजुरी दिली आहे. लवकरच या भागात विंधन विहिरी मारल्या जातील असे पालिकेने सांगितले आहे.
मोफत टँकरचे पाणी
एकीकडे मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प महापालिकेने हाती घेतलेला असताना दुसरीकडे शहरातील जुने आदिवासी पाडे पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत.याबाबत तक्रारी वाढल्यानंतर अशा आदिवासी पाड्यांना टँकरने मोफत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.