वसई: वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून ओला आणि उबर चालकांचे भाडेवाढीसाठी सुरू असलेले आंदोलन आता भीषण वळणावर पोहोचले आहे. शासनाकडून कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एका ओला चालकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सनोज सक्सेना (वय४५), असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून ते नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात राहत होता. त्यांनी बुधवारी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सदर चालक मागील अनेक वर्षांपासून ओला उबरसाठी काम करत होता. मात्र वाढत्या इंधनदरांमुळे आणि कमी झालेल्या भाड्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता. मागील तीन दिवसांपासून वसई-विरारमधील चालकांकडून भाडेवाढीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र त्याकडे शासन आणि कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने निराश झालेल्या सनोज सक्सेनांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती सहकाऱ्यांकडून समोर येत आहे.
या घटनेमुळे चालकांच्या संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.