भाईंदर :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा टँकर कठडा तोडून खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ .३० च्या सुमारास घडली. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून विरारवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून ऑइल ने भरलेला टँकर निघाला होता. सोमवारी सकाळी जुन्या वर्सोवा पुलावर पोहचताच रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर
टँकर अनियंत्रित होऊन पुलावरून थेट खाडीत कोसळला.या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती काशिगाव पोलीस व वाहतूक विभाग यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही पाचारण करण्यात आले असून शोधकार्य सुरू केले.आतापर्यंत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. अन्य कोणी व्यक्ती त्यात अडकला आहे का याचा शोध ही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याशिवाय हा टँकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.