लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील २५ लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा रचून कारवाई करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांचे वरळी एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन दिड कोटी रुपये ठरले. त्या खंडणीच्या रकमेतील २५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांश शहा (४५) आला होता.

शनिवारी रात्री भाईंदर येथील बनाना लिफ हॉटेल मध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांनी दिली. सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत २०१५ ते २०२० या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या बंडानंतर ते ठाकरे गटातच राहिले.

प्रकरण काय?

मुंबईत राहणारे तक्रारदार आकाश गुप्ता (३४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २०१२ पासून ते वरळी तसेच वसई विरार परिसरात बांधकाम व्यवसाय करत आहेत. गुप्ता यांच्या त्यांच्या कंपनीत हिमांशू शहा (४५) हा भागीदार आहे. गुप्ता यांची चिंतहररस चिंतपुरणी एलएलपी रिॲलर्टर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीला वरळी आदर्श नगर येथील दर्शन सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले होते. या प्रकल्पात २४० झोपडपट्टी धारक आहेत.

झोपडपट्टीधारकांना २ वर्षांचे भाडे देण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी परवागनी मिळाली असून काम सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी या तक्रारी दिल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार यांच्या कंपनीतील भागीदार हिमांशू शहा याने स्वप्नील बांदेकर याला तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.

२२ ऑक्टोबर २०२४ रोजी माटुंगा येथील स्टार बक्स मध्ये हिमांशू शहा, किशोर आणि आकाश गुप्ता यांची पहिली बैठक झाली. त्यावेळी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिड कोटीत तडजोड झाली. तक्रारदार २५ लाख देण्यास तयार झाले. त्यातील नोव्हेंबर २०२४ आणि डिसेंबर २०२४ मध्ये दर महिल्याला २५ लाख तर जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रति महिना १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते. अखेर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठला गुन्हा दाखल केला?

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.