सातत्याने रस्ता पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचा धोकादायक प्रवास
वसई : गुरुवारी सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे चिंचोटी ते कामण या रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून राहिले आहे. यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे.सातत्याने हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
वसई पूर्वेतील भागात चिंचोटी ते नागले परिसर आहे. याभागातूनच चिंचोटी ते भिवंडी असा महामार्ग गेला आहे. हा मार्ग ठाणे, भिवंडी, यासह इतर भागांना जोडत असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु सध्या पावसाळा सुरू झाल्याने या मार्गावरील चिंचोटी ते कामण या रस्त्याच्या मध्ये पाणी भरू लागले आहे. मागील काही वर्षांत या ठिकाणच्या भागात विविध प्रकारची विकास कामे झाली आहेत. तर काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात माती भराव करण्यात आला आहे. यामुळे पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
त्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही. या ठिकाणच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा हा ये जा करण्याचा एकमेव मार्ग असल्याने ये जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. जी अवजड वाहने आहेत ती यातून सहज वाट काढतात. परंतु दुचाकी, ऑटोरिक्षा यासह इतर छोटी वाहने यातून काढताना अडथळे येत आहेत. कारण विविध ठिकाणी छोटे – मोठे खड्डे ही पडले आहेत. या खड्डय़ामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पाणी साचून राहिल्याने ते दिसून येत नसल्याने धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.त्यातच जे पण पाणी जाण्याचे मार्ग होते त्याठिकाणी सुद्धा कचरा टाकला जात आहे. त्यावरही कोणाचे नियंत्रण नसल्याने सरार्सपणे कचरा आणून फेकला जातो. तर दुसरीकडे महामार्गाच्या कडेने पाणी जाण्यासाठी रस्ता ठेवणे गरजेचे होते ते न केल्याने येथील पाणी लवकर ओसरत नाही. याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागला आहे.