वसई : विरारमध्ये मंगळवारी झालेल्या इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून अडकलेल्या २६ जणांची सुटका केली. गुरुवारी दुपारी ३६ तासानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली.
मंगळवारी, २६ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास नारिंगी येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. ढिगाऱ्यात अनेक कुटुंबे गाडली गेली होती. याबाबत माहिती मिळताच महापालिकेचा अग्निशमन विभाग तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकड्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले होते. मात्र या परिसरात रस्ते अरुंद असून, चाळी आणि इमारती खेटून उभ्या आहेत. मोकळ्या जागांच्या अभावामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर मोठी वाहने पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. अखेर ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.बुधवारी सायंकाळपर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात आल्यानंतर रात्रीही शोधमोहीम सुरू होती.
गुरुवारी दुपारपर्यंत आणखी ११ जणांची सुटका करण्यात पथकांना यश आले. या दुर्घटनेत आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), पार्वती सकपाळ (६०), दीपेश सोनी ( ४१), सचिन नेवाळकर (४०), अर्णव नेवाळकर (११), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (१७), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंदसिंग रावत (२८), दीपकसिंग बोहरा (२५), ओंकार जोविल (२६), रोहिणी चव्हाण (३५) यांचा मृत्यू झाला असून संजय सिंग(२४), मिताली परमार(२८), प्रदीप कदम( ४०), जयश्री कदम (३३), विशाखा जोविल (२४), मंथन शिंदे (१९), प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०) या नऊ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकासकाला अटक
विकासक नितल साने (४८) याने २००९ मध्ये ही चार मजली अनधिकृत इमारत बांधली होती. इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याने ही इमारत कोसळली. सानेविरोधात विरार पोलीस ठाण्यात एमआरटीपीए कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.